Tuesday, 21 May 2024

अरुणा ढेरे - ह्यांच्या कथा

रामायण, महाभारत, पुराण, लोकसाहित्य इत्यादी आपल्या संस्कृतीची निरुपणे आहेत, आधुनिक दृष्टीतून,अपार समजुतीनं आणि जिव्हाळा..आणि तरीही पुरेसं वस्तुनिष्ठ असे आकलन करणे, ही सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया आहे. कथा आणि लोकसाहित्यातील विविध परंपरा ह्यांचा शोध घेणे; त्यांचा अर्थ नव्याने आणि नव्या दृष्टीने शोधणे; त्यांच्यातील, समकालीन वर्तमानातील पूल शोधण्याचा प्रयत्न करत राहणे आणि ह्यातून अर्थसंपन्न अनुभवांचे भावबंध शोधणे, ही अरुणाताईच्या कथा लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. 

             सामान्यत: प्रत्येक भारतीय माणसात आपल्या प्राचीन वारशाचं प्रेम असत, अस्मिता असते. रक्तात ओढ असते तो जाणून घेण्याची. अनेक अनुच्चारित प्रश्न असतात, त्यांची उत्तरे समजून घेण्याची उत्सुकता असते. समकालीन वास्तव  टिपणे आणि त्याचा सामान्य माणसाच्या भलेबुरेपणाशी अर्थ लावणे, हे लेखकाचे तरल कौशल्य आहे. प्रेम, अपेक्षा आणि अपेक्षाभंग. लौकिक यश -अपयश अशी संसारिक सुखदु:खे रंगवणाऱ्या कथा ...हा लोककथांचा आत्मा आहे. ह्या कथांतून संसारात बिनसलेले सावरायला मदत होते. पुन्हा नव्या उमेदीने नवा दिवस जगायला, नवा संघर्ष करायला ताकद मिळते. अरुणा ढेरे ह्यांच्या कथांतून हे सार शिकायला मिळत.

             अरुणाताईच्या कथांमधील स्त्रीपात्रे संवेदनशील आहेत. बाईचं शहाणपण आणि आत्मभान त्यांनी सहजपणे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिल आहे. विसाव्या शतकातील एक व्यासंगी, प्रगल्भ आणि कवी हृदयाची लेखिका या स्त्रियांबद्दल जे चितन करते, त्यात त्या त्या स्त्रियांची स्त्री म्हणून प्रतिष्ठा, सन्मान आणि अस्तित्व मोलाचं आहे. वडीलधारी, स्त्री-पुरुष पात्र त्यांच्या स्त्रीपात्रांना अनेकदा मूल्ययुक्त जगण्याचं बळ पुरवतात. त्यांच्याशी संवाद, त्यांचं  पाठबळ ह्यात महत्वाची भूमिका बजावतात.अरुणाताईच्या स्त्री चित्रणात आपुलकी आणि औदासिन्य, आकर्षण आणि अपसारण, जवळीक आणि दुरावा, भावनात्मक ओलावा आणि शुष्कपणा ,कोमलता आणि कठोरपणा, आस्था आणि अनास्था असे विविध परस्परविरोधी रंग विखुरलेले आहेत.