Tuesday, 9 November 2021

संवाद आणि साहित्य

 प्रत्येक साहित्य कृतीमध्ये संवाद म्हणजे बोलणे असते. व्यक्तीच्या माध्यमातून लेखकाची साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम संवाद करत असते. नाटक हे माध्यम तर संवादनिष्ठ आहे. नाटककार पात्रांच्याकरवी जे सांगत असतो, ते त्या नाटकाच्या कथानकापेक्षा अधिक महत्वाचे असते. कारण ह्या संवादांतून कथानक सजीव होत असते. कथानक आणि नाटक भावात्मक आणि व्यक्तिमत्व प्रधान होत असते. नाटक संहितेतील घटनांचे पात्रांवर घडणारे परिणाम, त्या पात्रांचे होणारे विचार मंथन, पात्रांचे आपापसांतील प्रतिसाद- प्रतिक्रिया- संघर्ष ह्यांचे निरुपण संवादात होत असते.

                कथा - कादंबरी सारख्या साहित्य प्रकारांत संवाद हे व्यक्तीपेक्षा कथानकाला धरून आलेले असतात. नायक - नायिका, खलनायक इत्यादी व्यक्ती कथानकाची प्रपुर्ती करण्यासाठी असतात आणि जेव्हा व्यक्ती आणि कथानक एकरूप जातात; तेव्हा त्या कलाकृतीचा लेखक प्रभावी न होता, ती कथा - कादंबरी अधिक प्रभावी होते. लेखकाची ओळख अशा कलाकृती वरून होऊन जाते. उदा. कोसला ह्या कादंबरी वरून भालचंद्र नेमाडे ह्यांना साहित्यिक म्हणून लोक ओळखू लागले. कोसलाचा नायक आणि कोसलाच्या कथानकापेक्षा कथेच्या संवादात्मक मांडणीमुळे डॉ नेमाडे नव कथा -कादंबरी लेखनाचे प्रवर्तक झाले.

                 कविता - काव्य लेखनात संवाद हा त्या त्या साहित्य कृतीतील प्रासंगिक किंवा प्रतीकात्मक असा भाव असतो. कारण कविता हे कवी आणि वाचक ह्यांच्यातील संवादात्मक नाते आहे. काव्यात्मक शब्द म्हणजे कवितेची रचना असते. म्हणून कवितेत संवाद अभावानेच येतात. 

                    संवाद हे भाषिक दळणवळणाचे माध्यम आहे तर आहेच; पण ते बोलीभाषेचे सूत्र आहे. लोककथा आणि लोक वांग्मय हा संपूर्ण प्रकारच संवादात्मक लेखन अविष्कार आहे. बोलीभाषा हे संस्कृतीचे प्रतिक आहे, त्यामुळे बोली भाषेतील संवाद कौटुंबिक साधे, सोप्पे, मिथके, म्हणी, वाकप्रचारइत्यादी साहित्य रचनांनी संपन्न असतात, 

                  भाषा निर्मिती हीच मुळी संवादाच्या निकडीतून निर्माण झाली. बोलणे ही प्राथमिक अवस्था, तर एकमेकांचे विचार, म्हणणे, सांगणे ....मला काय वाटतं....हे प्रवर्तित करणे...हे संवादाचे मुख्य मागणे असते. संवाद घडला नाहीतर विसंवाद घडतो किंवा मौन निर्माण होते. मौन ही सुद्धा एक भाषा आहे. पण तो विषय वेगळा आहे. विसंवाद म्हणजे भांडण, वाद विवाद, आरोप प्रत्यारोप, द्वेष आणि हिंसक कृत्ये, शिव्यागाळी घडत असतात. रागाची किंवा हिंसक कृत्यांची अभिव्यक्ती विसंवादातूनच घडत असते. 

                                                        *****************

 

Wednesday, 3 November 2021

लेखन म्हणजे काय?

 लिहिणे म्हणजे काय ?

                  लिहिणे हे एक अनुभवांचे कथन आहे; अनुभवलेल्या घटनांचे वर्णन आहे; आकलन आहे आणि आपले प्रतिक्रियात्मक निवेदन आहे. मूळ मात्र अनुभव आहे.

                 मुख्यत: पहाणे, ह्या क्रियेतून अनुभव येत असतो. पण अंध व्यक्तीलाही अनुभव येतात. म्हणजे अनुभव न पाहता येत असतात. म्हणून अनुभव म्हणजे जाणीव....ही जाणींव जितकी परिपोक्त, विश्लेषणात्मक, सौंदर्यपूर्ण, अभिजात आणि परिपूर्ण .....तितका अनुभव संपन्न होत असतो. 

                  तरीही कोणताही अनुभव पूर्णपणे संकीर्ण किंवा संपूर्ण नसतो. म्हणूनच साहित्य आणि कला निर्मिती ही जाणीवेच्या परिप्रेक्षात संपत नसते, संपूर्ण होत नसते. उदा. यमन राग गाणारा गायक त्या रागाचे आकलन, सौंदर्य, आणि स्वरांच्या जाणीवा कलात्मक दृष्टीने स्थळ - काळाच्या सापेक्षते मध्ये सादर करत असतो. पण ही स्वर - जाणीव किंवा अनुभवांची सजगता संपूर्ण कधीच होत नसते. म्हणून तोच गायक किंवा इतर कोणताही गायक हाच राग सादर करताना त्याला आणि श्रोत्यांना येणारा अनुभव नित्य नूतन असतो.

                  तेव्हा मला म्हणायचं आहे की जाणीव हा एक अनुभवाचा सिद्धांत आहे. स्वत:शी किंवा दुसऱ्यांशी संवाद साधणे, ही मूळ प्रेरणा आहे; किंबहुना ह्या प्रेरणेची जाणीव होणे, हे सजीव असण्याचे अधिष्ठान किंवा स्वसंवेद्य प्रतिपादन आहे. पण हे संवाद साधण्याचे प्रयत्न किंवा प्रयोग.... निराश करणारे आहेत. कारण खूप काही सांगून, लिहून, बोलूनही मला जे सांगायचे आहे, सांगायचे असते.....ते अपूर्ण आहे.....ही जाणीव संजीवन आहे. कालप्रवाहात सतत येणारे अनुभव आणि जाणीवा ह्यांचा प्रवास अनंत आहे, अमर्याद आहे. माझ्या जाणिवांचा प्रवास.....माझी अनुभव घेण्याची क्षमता जितकी मर्यादित आहे, तितका माझा लेखन प्रवास मर्यादित, अपूर्ण असा आहे. त्यामुळे मी असं म्हणतो की माझ्या जाणिवांचा प्रवास सतत विकसित होणारा अनुभव आहे; म्हणूनच तो सदैव अपूर्ण आहे. 

                                                                ************