Monday, 27 August 2018

आपण आणि विश्व

                      आपला भवताल विश्वाचा एक छोटासा भाग आहे, विभाग नाही. विश्व रचना पृथ्वीसह सूर्यमाला,आकाशगंगा, कृष्ण विवरे इत्यादींनी बनली आहे. विश्व हा एक महाविस्तृत पटल आहे, आलेख आहे. ह्या आलेखावर असंख्य अक्ष आहेत. जे एकामेकांना छेद देत असतात. ह्यातील दोन अक्षांचा विचार आपण करूया.
                    हे दोन अक्ष आहेत, अवकाश आणि काळ. आपल्या आयुष्यात घडणा-या घटना म्हणजे आपली कर्म आहेत. तर जगात घडणा-या घटना ही जगाची कर्म आहेत. ही दोन्ही कर्मे काळाच्या प्रवाहात घडत असतात.  ह्या घडणा-या दोन घटना म्हणजे अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षावर वाटचाल करणारी जगरहाटी आहे.  ह्या जगरहाटीचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि जीवनावरही परिणाम घडत असतो. हे दोन अक्ष ज्या बिंदूवर एकामेकांना छेडतात, त्या बिंदूवर परिणाम उद्भवत असतो. दोन अक्षावर वाटचाल करणा-या घटना आपल्या व्यष्टीशी अनुकूल किंवा सुसंगत असतील, तर घडणारे परिणामही चांगले असतात. पण ते तर विसंगत किंवा प्रतिकूल असतील, तर परिणामही वाईट किंवा ते दुष्परिणाम आहेत, असं आपण म्हणतो.
                     थोडक्यात असे की अवकाश आणि काळ ह्या अक्षांचा छेदन बिंदू आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतो. म्हणजेच असे की घडणारा परिणाम हा विश्व कर्म आणि आपले कर्म ह्यांचा साकल्यपूर्ण  किंवा संकीर्ण परिणाम असतो. आपल्या आयुष्याची जडणघडण अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षांवर घडत असते. प्रत्यक्ष भोगावे लागणारे परिणाम किंवा फळ हा जग आणि आपण ह्यांच्या कर्माचा विपाक असतो आणि तो म्हणजे अवकाश व काळ ह्यांचा छेदन बिंदू असतो.
                     आपले आयुष्य विश्वापासून अलग किंवा पृथक नसून विश्व रचनेतील एक परिणामकारक घटना आहे. म्हणून असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये  घडणा-या प्रत्येक किंवा संकीर्ण घटनांचा संबंध व नाते विश्वात्मक आहे. सूर्यावर घडणा-या घटना, ग्रह-तारे ह्यांच्या गतीमध्ये व स्थानांमध्ये घडणारे बदल अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतात. उदा. प्रदूषण ही समस्या. जंगले, वृक्ष वनराजी, ऋतू, आणि आपले आरोग्य ह्यांचा निकटचा संबंध आहे, हेच प्रदूषण ह्या समस्येने अधोरेखित केले आहे. दुस-या टोकावर आपले ज्योतिष किंवा भविष्य शास्त्र आहे, ज्या मध्ये ग्रहांची स्थाने, गती, दशा इत्यांदिंचा सखोल विचार झालेला आहे. पण तो अपूर्ण आहे. शिवाय निष्कर्ष पद्धती अवैज्ञानिक आहेत. कारण वैज्ञानिक पद्धतीने, सूत्रबद्ध संशोधन ह्या शास्त्रांचे झालेले नाही. त्यामुळे त्यांची भाकिते किंवा निष्कर्ष सत्य असतातच, असे नाही आणि ह्यामुळे ह्या शास्त्रांचे महत्व त्यामुळे कमी नव्हे तर विश्वास ठेवण्या इतपत नाही. हे मान्य केलेच पाहिजे. दुसरे असे की वैद्यक शास्त्रात सुद्धा डॉक्टर जितका निष्णात, तितके त्याचे रोगनिदान अचूक असते. डॉक्टरचे रोगनिदान चुकले म्हणून वैद्यक शास्त्र खोटे किंवा चूक ठरत नसते. त्याचप्रमाणे, ज्योतिष शास्त्रज्ञ जेव्हढा निष्णात, तितके त्याने वर्तविलेले भविष्य, विशिष्ट घटने आणि काळा संदर्भात तेवढ्यापुरते सत्य असते, तेव्हढ्याच चौकटीत खरे असते.

पारंपारिक विचार आणि बुद्धिवाद

परंपरा म्हणजे काय, हा प्रश्न प्रथम समजून घेण्यासारखा आहे. प्रत्येक माणूस हा आपल्या बरोबर जन्मत:च अनुवांशिक hereditary गुण-दुर्गुण घेऊन जन्माला येत असतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. ही अनुवंशिकता ह्यालाच अध्यात्मामध्ये आधिभौतिक म्हणतात, असं माझं मत आहे.
                दुसरा भाग म्हणजे जन्मत:च फ्राईडच्या मानसशास्त्रानुसार प्राणिजात उत्क्रांतीचे अंश आपल्या बरोबर घेऊन जन्माला येत असतात.
               तिसरा भाग म्हणजे ह्या वरील दोन्ही भागांचे एकत्रित असे अनेक समूह आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या म्हणजे मेंदूच्या रचनेत समाविष्ट होऊन आपण जन्म घेत असतो.
                ह्या तिन्ही भागांचा मिळून जो कोष तयार होत असतो, त्याला स्मृतिकोष म्हणतात. स्मृतिकोष हा सतत, सातत्याने आणि सदैव जागृत असतो. झोप-निद्रा, बेशुद्ध आणि कोमा ह्या तिन्ही अवस्थेत वेगवेगळ्या पातळ्यांवर हा कोष अस्तित्वात रहात असतो.
                परंपरा म्हणजे ह्या दृष्टीकोनातून स्मृतिकोष हा एक वैचारिक, तात्त्विक, तर्कनिष्ठ आणि संवयीचा असा भाग आहे. म्हणजे असं की आपल्या धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आणि पिढ्यानपिढ्या संस्कारित असा एक भाग आहे. ह्याच्यावरून आपले व्यक्तिनिष्ठ, व्यष्टीधारक आणि अत्यंत सूक्ष्म असे एक व्यक्तित्व विकसित होत असते. तसेच, आपले कौटुंबिक, सामाजिक, समूहवाचक, आर्थिक, राजकीय आणि समष्टीधारक व्यक्तिमत्व विकास पावत असते.
                   ह्यावरून असे दिसते की पारंपारिक विचारसरणीवर मुख्यत: प्रभाव,  पिढीजात संस्कार व सामाजिक विचारांचे असतो.  पिढीजात संस्कार म्हणजे पारदर्शीपणे जाणवणारे आई-वडील व इतर नातेवाईक. ह्यांचे आचार-विचार विश्व होय. ह्या पारदर्शी विचारसरणीच्या साकल्याने आपलाही एक वैचारिक गाभा तयार होत असतो. पण व्यक्ती पातळीवर प्रत्येक व्यक्तीवर आधुनिक विचारसरणी, शिक्षण, मित्रमंडळ, समाज, राजकारण, आर्थिक क्षमता इत्यांदिंचा प्रभाव अधिक मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे व्यक्तिमत्व तयार होत असते. अशा प्रकारे आपल्या बाह्य भवतालाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव  आपल्या व्यक्तिमत्व विकास क्षमतेवर होत असतो. तदनुसार, काहींचे व्यक्तिमत्व बाह्य संस्कारित अधिक झाल्यामुळे अशा व्यक्ती extrovert किंवा introvert होतात. Extrovert व्यक्ती बाह्य संस्कारांमुळे व्यक्त होताना open minded, हजरजबाबी, आणि आक्रमक होत असतात. तर introvert व्यक्ती फारश्या बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, सतत विचार करीत राहतात, कुढत राहतात आणि काही वेळा,apparent or latent or hidden मनोरुग्ण होतात.
               साहित्यिक व कलेच्या क्षेत्रातील लोक संवेदनशील, सर्जनशील आणि सृजनशील असतात. त्यांच्यावर समाजशील माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून दोन्ही अस्तित्वाचा प्रभाव असतो. त्यांची जडणघडण इतर लोकांप्रमाणे होत असते. त्यांच्यावरही परंपरा, संस्कृती, इ इ वरील मानवी मनाच्या व बुद्धीच्या रचनांचा प्रभाव असतो. त्यामुळे, आशा-निराशा, सुख-दुख: इ द्वंद्वे, पारंपारिक आचार-विचार इ चे  परिणाम त्यांच्यावर ही होत असतात. साहित्यिक व कलावंत ह्या सर्व परिणामांचा, द्वंद्वात्मक जगाचा, आणि स्वत:चा भावनात्मक अर्थ लावू शकतो. ही अर्थ लावण्याची त्याची क्षमता किती सखोल, सदृढ, जाणीवेच्या-नेणीवेच्या पातळीवर स्थिर-अस्थिर असते, आणि ह्या क्षमता शब्द, चित्र, शिल्प इ माध्यमातून तो कसा मांडू शकतो....ह्यावर त्याची प्रतिभावंत प्रज्ञा विकसित होत असते. 
                

Friday, 1 June 2018

विंदा- रक्तसमाधी


रक्तसमाधी:
विचार-वाचन-व्याख्यानांनी होऊन वेडे आपण
खेडे शोधत गेलो;
आणि शेवट आलो धावत जेथे
आकाश निळे वरती;
आपण भूमीवरती;
हिरवळ आपुल्या भोवती;
आणिक देवीच्या राईतिल पक्षी कुजबुज करिती.

आतुरतेने संकल्प होऊन आलिस तू मग जवळी
आणिक त्या वेळी ! त्या अद्भुत काली !
अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यांतुनिया
त्याहुन काळी उफाळली मग ज्वाळा;
गाल बोलले; नेत्र बोलले; ओठ बोलले; एकच माला...माला

केस तुझे सुटलेले पाठीवरती;
उभारलेले स्तन टवटवते पुढती;
आणिक त्या उन्मादक
भरिव नितंबाच्या भवतीच्या नीटस रेषा मोहक;
नितंब गोरे, मृदुल, गोल नी मांसल;
मस्त, पुष्ट, मादक मांड्या थरथरती;
विवस्त्र झालेली तव कंबर माझ्या पुढती झुलती.

हृदयाशी घट्ट घेउनी आवळताना तुजला
देह जाहला घामाने ओला;
तीव्र, गूढ नि:श्वसने
गाउ लागली अनंत अपुरे गाणे;
मृत्युतुनही अमर लागले होऊ;
जीवाजिवांच्या तारा सा-या जुळल्या;
संगितलहरी उठल्या रुधिरामधुनी;
जुन्या काळची नव्या सुरातुन गाउ लागलो गाणी;
तुझ्यात गेलो, विरलो; आणिक मेलो;
मजला पाजुन, तुजला गिळलो; प्यालो;
मीपण गेले; तूपण आले...आले.
जीवन संगित झाले, जीवन प्याले !

अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी
अद्वैतातच विरल्या सा-या गाठी;
विसरुनी गेलो अद्वैतातच मीपण,
स्वत्त्वाचे संरक्षण;
आणि त्या आत्यंतिक अद्भुत वेळी
दिक्कालाची बेडी भंगून गेली.
रक्तसमाधित दिव्य रवाने वदलो जेव्हा दोघे
तू- “ये...ये ...”, मी- “ घे....घे....”
रक्तसमाधी लागुन विरली माया;
रक्तातुनिया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया !
-    विंदा

एक काळ होता, जेव्हा ओशो “ संभोगातून समाधीकडे” ह्या विषयावर बोलले, तेव्हा त्यांच्यावर टीकेचे आसूड वगैरे ओढले गेले. ह्याच सुमारास विंदा रक्त समाधी प्रसिद्ध करून राहिले होते.
     मराठी साहित्यात विशेषत: कथा, कादंबरी इ.... ह्यातून वैयक्तिक विचार करण्यास लावण्याच्या स्वातंत्र्यावर समाजाने एक तर दुर्लक्ष करण्याची किंवा सहानुभूतीची भूमिका घेतली आहे. आजही अश्लील नव्हे...किंबहुना अश्लील कशाला म्हणायचे, ह्यावर चर्चा, वादंग चालू आहेतच.
       विंदांची ही कविता ह्या सा-या चर्चांना कदाचित उत्तर ठरावे, इतकी धाडसी रचना आहे. ह्या रचनेला कविता म्हणायचे तर समीक्षक किंवा आस्वादक म्हणून जे निकष मी लावीन ते इतर समीक्षक लावतीलच, असं नाही. प्रश्न ही कविता आहे की नाही हा नसून रक्त समाधी मध्ये मांडलेला विषय काय आहे, हे प्रथम समजून घेणे योग्य आहे.
       विंदांच्या कवितेत तर्काधिष्ठता हा नेहमीच वादग्रस्त प्रश्न राहिलेला आहे. ह्या कवितेत तर्काने काही जाणलेलं नाहीयेय. प्रत्येक माणसामध्ये एक आत्मतत्व असतं. ते आदीम संस्कृती पासून संभोग हे राहिलेलं आहे. म्हणूनच रक्तसमाधीची सुरुवात विचार-चिंतन-व्याख्यानांनी वेडे झालेल्या आपण ने होते. मग निसर्गाच्या सान्निध्यात निळे आकाश, हिरवळ, पक्षांची कुजबुज आहे. ह्यातून विंदांनी एक प्रतिमा निर्मिती साधली आहे. आपण भूमीवरती ह्या वास्तवाच्या संकल्प योजनेतून विंदा निसर्गाचे आणि भूमी म्हणजे पृथ्वीचे नाते सूचित करीत आहेत. निसर्ग हा पुरुष आणि पृथ्वी ही स्त्री हा संकेत ते करीत आहेत; आणि त्याचवेळी “आपण भूमीवरती” ह्या वास्तवाचे भान राखून मनुष्य मात्र वेडा आहे, हे मार्मिकपणे मांडत आहेत. आणखी एक शब्द आहे: देवीच्या राईतिल देवी देवळात असते. पण विंदांची देवी ज्या राईत म्हणजे राऊळीत म्हणजे गावात आहे, तेथील पक्षी कुजबुज करून संकेत देत आहेत, पुढील कडव्यात येणा-या अद्भुत काळाचा म्हणजे घटिकेचा ! माला ही स्त्री आहे, तिच्या मागे लागलेला उन्माद...कसा आहे...विंदा म्हणतात, “ अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यातून....” हा आहे काळा डोह म्हणजे वासनेचा डंख आहे. तो तिला भेटतो. हे वर्णन म्हणजे विंदांचा शृंगार प्रगट करण्याचा एक झपाटा आहे, झंझावात आहे.....त्या झपाट्याचा उत्तरार्ध मात्र काहीसा शांत होताना तीव्र आहे पण गूढतेच्या नि:श्वसनात मग्न झाला आहे.
          ह्या पुढील वर्णन संभोगा नंतर जी एक अवस्था निर्माण होते, ती मांडताना विंदा भावूक होत नाहीत, माणसाच्या आत्मतत्वाच्या निष्ठा शोधू लागतात. म्हणून ते म्हणतात, “ मीपण गेले, तूपण आले...आले ”. ह्या तूपणाची “आले..आले” ही प्रतिध्वनीत्व प्रतिमा “ माला...माला “ ह्या अभिव्यक्तीच्या टोकाशी आहे.....संकेत हा आहे की पुरुष हा स्त्री मध्ये विरून जातो...ध्वनीच्या मागून प्रतिध्वनी विरून जावा तसा.....हीच प्रतिमा विंदा   तिस-यादा वापरतात, : तू “ ये...ये “ आणि मी “ घे...घे “ ह्या समारोपात. पुरुष स्त्री तत्वात विलीन होत असतो. शिवाची पिंड हे ह्या तत्वाचे प्रतिक आहे. स्त्रीचे जननेन्द्रिय खोल आहे तर पुरुषाचे त्या सखोलपणात शिरून स्वत:ला समर्पित करणारे इंद्रिय आहे.
        द्वैत-अद्वैत किंवा व्यक्त-अव्यक्त ह्या शब्दांच्या प्रतिमा अध्यात्मिक असून संभोगाच्या अनुभवाशी समाधी हे नाते किती सुसंगत आहे. हे स्पष्ट करण्याचा विंदांचा प्रयत्न आहे. “ दिक्कालाची बेडी भंगून गेली.” आणि        “ रक्तातुनिया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया “ हा अनुभव वास्तव पातळीवर समजून घेता येतो. गर्भ निर्मितीचा क्षण हा पुरुष-स्त्री ह्याच्या रक्तमय स्त्रावातून होत असतो. हे विज्ञान विंदा काव्यात्म पद्धतीने मांडतात.
             ओशोंनी जो अध्यात्मिक सिद्धांत मांडला आहे, तोच काव्यात्म पद्धतीने विंदांनी मांडला आहे. संभोगातील पुरुष-स्त्री ह्यांचे सख्खलन ज्या अतिउच्च बिंदूला, climax ला , क्षणाला होते, त्या क्षणाला त्या दोघांच्या मीलनातून गर्भ निर्मितीची प्रक्रिया सुरु होत असते. तो क्षण म्हणजे त्या गर्भाचा शून्य 0 काळ असतो. त्या 0 क्षणापासून टप्प्याटप्प्याने जीव विकसित होऊन ९ महिन्यांनी जन्म पावतो. ही शून्यावस्था म्हणजेच समाधी होय. हा जीव निर्मितीचा क्षण असतो. त्या जीवाची कालगणना त्या क्षणापासून सुरु होते. आणि ही अवस्था ज्या दोघांच्या म्हणजे ज्या द्वैतातून घडते व गर्भ किंवा जीव ह्या अद्वैतातून विराम पावते......त्या अवस्थेला वैज्ञानिक सत्याचे अन्वेषण म्हणजे काव्यात्म न्याय विंदांनी रक्तसमाधी ह्या रचनेद्वारा दिला आहे.
                 ***************

विंदा - निळा पक्षी


निळा पक्षी
निळा पक्षी    काही केल्या
निळा पक्षी    जात नाही.

प्रकाशाचे     पंख सान
निळी चोच   निळी मान;
निळे डोळे   निळी चाल
निळा ढंग;   त्याने चढे
आकाशाला   निळा रंग.

असली ही   जात न्यारी
बसे माझ्या  बिम्बावरी;
पृथ्वीवरी;   पृथ्वीमध्ये
पाळे खोल;  तरीसुद्धा
जाई तोल;  ....अनंताचा
खड्डा खोल.

तर्काच्या या गोफणीने
फेकीतसे काही जड;
आणि पाने आघाताने
करतात तडफड;
टिकाळीला निळा पक्षी
जसा धड  तसा धड;
...उंच जागा अवघड.

याचे गान  याचे गान
अमृताची  जणू सुई;
पांघरूण  घेतो जाड,
तरी टोचे;

झोप नाही. मेलेल्याला;
जागृतांना  करी घाई.
याचे गान  याचे गान
स्वरालाच  नुरे भान.
नाही तार  नाही मंद्र;
....चोचीमध्ये धरी चंद्र.

काही केल्या   काही केल्या
निळा पक्षी   जात नाही.

-विंदा.

विंदांच्या आणि नारायण सुर्वेंच्या कवितांनी विद्रोही भाव -भावनांना अभिजात दर्जा दिला. तोपर्यंत विद्रोह ही एक चळवळ मानण्या इतपतच कवितेकडे पाहिले जात होते. विंदांच्या कवितांचे आगळेपण मराठी साहित्याने मुख्यत: नमूद करून घेतले आहे, ते त्यांच्या विसंगतीतून सुसंगती शोधून सत्याच्या विविध अंगांची तपासणी करण्याच्या विंदांच्या मुलभूत प्रवृत्तीमुळे. विंदा बुद्धिवादी आहेत, नास्तिकत्वाकडे त्यांचा ओढ आहे. पण त्यांचा पिंड आत्म निष्ठेचा असल्यामुळे अध्यात्मिक तत्वज्ञान त्यांच्या कवितेतून डोकावत राहते. आत्मतत्वाची तार्किक सुसंगती न सापडल्याने ते व्यथित होतात.
            निळा पक्षी मध्ये “ असली ही जात न्यारी, बसे माझ्या निम्बावरी, पृथ्वीवरी | पृथ्वीमध्ये पाळे खोल, तरी सुद्धा जाई तोल.....अनंताचा खोल खड्डा.” माझं निळा पक्षी हे त्यांच्या अतींद्रिय अनुभवाचे प्रतिक आहे.....पृथ्वी हे आत्मविश्व आहे....ह्या विश्वात्म संवेदनेला निळा पक्षी अनंताच्या खोल गाभा-यात विंदांना घेऊन जातो. तेव्हा त्यांना आढळते, गूढ गर्भित विवर. इथे विंदांची विज्ञान निष्ठा निळ्या पक्ष्याला घेऊन जाते black hole ह्या संकल्पनेत. विंदांची प्रतिभा एकाच ठिकाणी कधी स्थिर नसते. ते एकाच अनुभवाच्या परिप्रेक्षात साहित्याचे, विज्ञानाचे आणि त्यांच्या आत्म प्रज्ञेचे विविध संस्कार प्रगट करते.
        निळा पक्षी हे खर तर एक प्रहसन आहे. “ तर्काच्या या गोफणीने फेकीतसे काही जड “ अशा आविर्भावाने मध्ये व्यक्त होते. मग विचारांची आंदोलने आविष्कृत होतात, “ आणि पाने आघाताने करतात तडफड.” तरीही वास्तवाचे भान न सुटल्यामुळे “ ...उंच जागा, अवघड “ हे ही त्यांना एका ‘टिकाळीला’ बसल्यावर कळते. पण तिथेही हा निळा पक्षी गातो... त्यांचे गान   “ अमृताची जणू सुई “ आणि “ पांघरूण घेतो जाड, तरी टोचे.” पक्ष्याचे गाणे ऐकताना विंदांची प्रतिभा शांत नाही....त्या गाण्यातील अमृताची गोडी त्यांना चाखता येत नसल्याने ते गाणे सुई सारखे टोचते. कान बंद केले तरी टोचत राहते. ही विद्रोही कवीची व्यथा आहे. विंदा एकाच अनुभवात रमत नाहीत, त्यांना वास्तवाची प्रखर जाणीव सतत अस्वस्थ करत राहते. म्हणून ते म्हणतात, “ झोप नाही. जागविते मेलेल्याला; जाग्रुतांना करी घाई. “ निळ्याचे गान कसे आहे...कवीचा थंड, गाढ झोपी गेलेला आत्मा जागविणारे आहे आणि  जागेपणात उठून उड्डाण करण्यास प्रवृत्त करणारे आहे. कारण ह्याच्या गाण्यात सुरांचेही भान हरपते ! ह्याच्या सुरांना मंद्र सप्तकाचा आधार नाही की तार सप्तकाची धार ! चोचीमध्ये चंद्र घेऊन उडणारा हा आहे, विंदांचा आशावाद.
           अखेरीस हा निळा पक्षी आहे तरी कोण ? अतींद्रिय अनुभवांना कवेत घेऊन माणसाच्या जगण्याचा शोध घेणारा हा आहे विंदांचा परमात्मा. आत्म निष्ठेच्या पंखांचे आधार घेऊन माणसाच्या अंतर्यामी परमात्म्याचा शोध घेणारा विंदा हा एक महान प्रतिभावंत आहे.
                ************

नरहर कुरुंदकर -विचार


साहित्य परिषदा व साहित्य संमेलने- नरहर कुरुंदकर विचार
(१)  जन्म- न्या रानडे- १८७८-म फुले व ज्योतिबा निमंत्रित- ज्योतिबा गेले नाहीत. ज्योतिबांचा आक्षेप- सहभागी साहित्यिक वर्ग प्रामाण्यवादी- आजही तीच परिस्थिती- वेगवेगळी संमेलने, परिषदा, बौद्ध, ख्रिश्चन इ ची वेगळी चूल.
(२)   पारंपारिक भारतीय समाज रचना-विषमता आधारित – इंग्रजांनी मात्र सत्ताकाराणासाठी सर्व जाती,धर्म,भाषां संस्कृती इ एकत्र मानले, आणि  राज्यशकट चालविला. साहित्य परिषदांना असा इतिहास नाही. त्यामुळे, साहित्य परिषदांचा कारभार आजही जातीभेद, धर्म इ वर अधिकृत किंवा अनधिकृत चाललेला आहे.
(३)   तरीही स्वातंत्र्या नंतर अनेक बदल घडत आहेत. हे बदल :
(अ)      साहित्य परिषदा परंपरावादी राहिलेल्या नाहीत. काही राहिलेल्या असल्या तरी त्याला साहित्यिक जबाबदार नाहीत. त्याला जबाबदार भोवतालची परिस्थिती होती आणि आहे.
(आ)   साहित्य परिषदांचे उद्देश व कार्य साहित्य संवर्धनाचे, प्रोत्साहनाचे, अभिवृद्धीचे आहे. सामाजिक चळवळ, धर्म-जाती व्यवस्था निर्मुलन किंवा व्यवस्थापन हे त्यांचे कार्य नाही.
(इ)        साहित्य परिषदा सुधारणे हे काम सामाजिक असले तरी ह्या कार्यात असलेल्या साहित्यिकांनीच ते कार्य परिषदेच्या आतून करावयास हरकत नाही. पण त्यामुळे मूळ कार्य आणि उद्देश बाजूला राहता कामा नयेत.
(4) १८५८ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. १८६०-७० ह्या काळात विद्यापीठ अंतर्गत मराठीतून वांग्मय निर्मिती व्हावी, अशी जिद्द दिसते. १८८० नंतर मात्र विद्यापीठात मराठीचे स्थान अवनीत होत गेलेले आहे. पण तरीही मराठी साहित्य निर्मिती व्वृद्धी बहरतच गेली. त्यामुळे लो टिळक आदींच्या जहाल राजकारणा पासून परिषदा वेगळे स्थान टिकवून ठेवू शकल्या. आजही राजकारण फारसे परिषदांमध्ये लुडबुड करताना दिसत नाही. उदघाटना पलीकडे काही फारसे ते करतात असे दिसत नाही !
(५) साहित्य परिषदांनी हाताळलेला दुसरा महत्वाचा प्रश्न शुद्धलेखनाचा आणि भाषा शुद्धीचा. शुद्धलेखनावर खरी जुंपली ती पुरोगामी आणि सनातनी विचारवाद्यांची....त्यातून पारिभाषिक शब्दांची पडलेली भर....आता हे वाद मिटले असून पारिभाषिक शब्दांचा वापर वृत्तपत्रांनी सुटसुटीत केल्याने मराठी भाषा विद्रूप होईल, ही भीती राहीली नाहीयेय. उलट, हे शब्द मराठीचे अभिव्यक्ती सामर्थ्य वाढवीत आहेत.
(६) १९३५ नंतर लोकप्रतिनिधींच्या हातात प्रांतिक आणि १९५२ नंतर राज्यांचा कारभार आला. मुंबईसह महाराष्ट्र ही चळवळ मुख्यत: भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर झाली आणि यशस्वी झाली.
(7) स्वातंत्रोत्तर काळात विद्यापीठातील पदव्या व पद्वुत्तर शिक्षण ह्यातून जो नवीन अध्यापक आणि विद्यार्थी वर्ग निर्माण झाला, त्यांना त्यांची ग्रंथालये व इतर सोयी परिषदांच्या सहभागा शिवाय उपलब्ध झाल्याने त्यांना परिषदांची गरज राहिली नाही. नंतर निर्माण झालेली शासकीय पारितोषिके, पद्मश्री इ बहुमान,अनुदान मंडळे, स्थानिक व दूरदर्शन वाहिन्यांची पारितोषिके इ इ मुळे मराठी साहित्य निर्मिती भरभराठीस इतकी झाली आहे की बहुमान-पारितोषिके इ साठी साहित्य कमी पडू लागले आहे, हे पारितोषिक मिळणा-या साहित्याच्या दर्जा वरून लक्षात येते.
(८) लेखकाच्या मुख्य तीन गरजा असतात- (अ) आपले लिखाण जास्तीत जास्त जनते समोर न्यायचे असते. (ब) त्याला यासाठी प्रकाशकाची गरज असते (क) त्याला आर्थिक फायदा, प्रतिष्ठा, आणि प्रसिद्धी हवी असते. ह्यासाठी तो आर्थिक झीझ ही तो सोसायला तयार असतो. कारण हल्लीचे ९०-९५ टक्के प्रकाशक लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक छापत असतात.
(९) पैसा व प्रसिद्धी प्राप्त करून अनेक लेखक ग्रंथ,लेख, नाटक, कादंबरी, चित्रपट कथा-पटकथा, दूरदर्शन मालिका इ विविध क्षेत्रात निर्मिती करून, शाळा-कॉलेज भाषणे मधील भाषणे, व्याख्यानमाला,इ उपक्रमांद्वारे प्रसिद्ध होत असल्याने परिषदांचे व्यासपीठ फारसे गरजेचे राहिलेले नाही.
(१०) ख-या विचारवंत, प्रतिभावंत लेखकांची अत्यंत महत्वाची गरज असते.....जाणकार,समीक्षक,सुविज्ञ अधिकारी व्यक्तींकडून तपासणी व्हावी, मान्यता प्राप्त साहित्यिकांनी आपल्या लिखाणाचे गुणग्रहण करावे....याची नशा हजार मंडळींनी वाजविलेल्या किंवा वाजवून घेतलेल्या टाळ्यांपेक्षा निराळी-और असते. असा गुणग्राहक वर्ग दिवसेंदिवस मर्यादित होत चालला आहे. ह्या बाबतीत साहित्य परिषदांकडून खूप अपेक्षा आहेत. पण परिषदाही सन्मान प्राप्त, प्रसिद्ध साहित्यिकांचे कार्यक्रम करण्यात, गर्दी जमविण्यात समाधान मानू लागल्या आहेत.
(११) हल्ली अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष निवडणुकी वरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यातील एक “ साहित्यिक कोणाला म्हणायचं “ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या वादाचे प्रथम दर्शनी दिसते, तितके सोपे, साधे व सरळ नाही !कारण भाषा आणि वांगमय हा व्यवहार गुंतागुंतीचा आहे. मतदान म्हणल्यावर त्याची गणिते, आर्थिक उलाढाल, मतांची पळवापळव, मतपेट्या manage करणे इ सर्व व्यवहार-गैर व्यवहार अपरिहार्य होतात. त्यामुळे सभासद कोणाला व कसे निवडून देतात, हे फार मोठे गुपित राहिलेलं नाहीयेय.
(१२) शेवटचा व महत्वाचा मुद्दा हा की साहित्य परिषदे सारख्या संघटना साहित्यावर प्रेम करणा-यासाठी आहेत की साहित्यिकांसाठी आहेत? जर साहित्यावर प्रेम करणा-याच्या असतील तर परिषदांमध्ये विद्वान मान्यतेपेक्षा लोकमान्यता मान्य केली पाहिजे. लोकानुरंजन झाले पाहिजे, मतदान झाले पाहिजे.इ.इ. पण लोकमान्यता ही मोठी निर्दोष बाब आहे, असे नाही. त्याचप्रमाणे, प्रतिभावंत साहित्यिक सुद्धा मत्सरग्रस्त, मान, मानधन,आग्रह आणि पाहुणचार ह्यामध्ये अडकलेले नसतात, असे नाही.
(१३) थोडक्यात, गेली ६०-७० वर्षे परिषदांचा कारभार ज्या पद्धतीने चालतो, त्या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. त्यांना आपला कायापालट करताना वान्गमयीन व्यवहारात आपल्या संघटनेचे स्थान काय असावे, हे निश्चित केले पाहिजे. परंपरागत दृष्टी आणि दृष्टीकोन सोडून त्यांनी हे निश्चितपणे जाणून घेतले पाहिजे की साहित्य परिषदा स्पर्धक नसतात. त्या उपकारक असतात. तसेच, कलेसाठी कलावाद किंवा जीवनसाठी कला अशा लढाया करून परिषदा चालविता येणार नाहीत. परिषदांची मुखपत्रे व त्यांची संपादक मंडळे ह्यांनी मुखपत्र हे साहित्य सेवेसाठी आहे, हे सूत्र बांधून घेतले पाहिजे आणि लोकप्रियता ह्या निकषा पासून दूर राहिले पाहिजे.
(१४) निरनिराळे साहित्य प्रकार अभ्यासू वृत्तीने परिषदांनी हाताळले पाहिजेत. उदा. शोकांतिका, कॉमेडी ह्या किंवा इतर वांगमय प्रकारांची सखोल अभ्यासने चालविली पाहिजेत. प्राचीन वान्गमयातील श्रेष्ठ साहित्यमूल्यांचा अभ्यास अजूनही मर्यादित आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या नियोजनात परिषदा भरीव कार्य करू शकतात.
(१५) सारांश रूपाने असे म्हणता येते की सर्वसंग्राहक असणे आणि सर्व इष्ट बाबींना उपकारक होणे, या दोन पद्धतींच्या आधारेच परिषदांची नवी मांडणी होऊ शकेल.
                     **************