Monday, 27 August 2018

आपण आणि विश्व

                      आपला भवताल विश्वाचा एक छोटासा भाग आहे, विभाग नाही. विश्व रचना पृथ्वीसह सूर्यमाला,आकाशगंगा, कृष्ण विवरे इत्यादींनी बनली आहे. विश्व हा एक महाविस्तृत पटल आहे, आलेख आहे. ह्या आलेखावर असंख्य अक्ष आहेत. जे एकामेकांना छेद देत असतात. ह्यातील दोन अक्षांचा विचार आपण करूया.
                    हे दोन अक्ष आहेत, अवकाश आणि काळ. आपल्या आयुष्यात घडणा-या घटना म्हणजे आपली कर्म आहेत. तर जगात घडणा-या घटना ही जगाची कर्म आहेत. ही दोन्ही कर्मे काळाच्या प्रवाहात घडत असतात.  ह्या घडणा-या दोन घटना म्हणजे अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षावर वाटचाल करणारी जगरहाटी आहे.  ह्या जगरहाटीचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि जीवनावरही परिणाम घडत असतो. हे दोन अक्ष ज्या बिंदूवर एकामेकांना छेडतात, त्या बिंदूवर परिणाम उद्भवत असतो. दोन अक्षावर वाटचाल करणा-या घटना आपल्या व्यष्टीशी अनुकूल किंवा सुसंगत असतील, तर घडणारे परिणामही चांगले असतात. पण ते तर विसंगत किंवा प्रतिकूल असतील, तर परिणामही वाईट किंवा ते दुष्परिणाम आहेत, असं आपण म्हणतो.
                     थोडक्यात असे की अवकाश आणि काळ ह्या अक्षांचा छेदन बिंदू आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतो. म्हणजेच असे की घडणारा परिणाम हा विश्व कर्म आणि आपले कर्म ह्यांचा साकल्यपूर्ण  किंवा संकीर्ण परिणाम असतो. आपल्या आयुष्याची जडणघडण अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षांवर घडत असते. प्रत्यक्ष भोगावे लागणारे परिणाम किंवा फळ हा जग आणि आपण ह्यांच्या कर्माचा विपाक असतो आणि तो म्हणजे अवकाश व काळ ह्यांचा छेदन बिंदू असतो.
                     आपले आयुष्य विश्वापासून अलग किंवा पृथक नसून विश्व रचनेतील एक परिणामकारक घटना आहे. म्हणून असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये  घडणा-या प्रत्येक किंवा संकीर्ण घटनांचा संबंध व नाते विश्वात्मक आहे. सूर्यावर घडणा-या घटना, ग्रह-तारे ह्यांच्या गतीमध्ये व स्थानांमध्ये घडणारे बदल अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतात. उदा. प्रदूषण ही समस्या. जंगले, वृक्ष वनराजी, ऋतू, आणि आपले आरोग्य ह्यांचा निकटचा संबंध आहे, हेच प्रदूषण ह्या समस्येने अधोरेखित केले आहे. दुस-या टोकावर आपले ज्योतिष किंवा भविष्य शास्त्र आहे, ज्या मध्ये ग्रहांची स्थाने, गती, दशा इत्यांदिंचा सखोल विचार झालेला आहे. पण तो अपूर्ण आहे. शिवाय निष्कर्ष पद्धती अवैज्ञानिक आहेत. कारण वैज्ञानिक पद्धतीने, सूत्रबद्ध संशोधन ह्या शास्त्रांचे झालेले नाही. त्यामुळे त्यांची भाकिते किंवा निष्कर्ष सत्य असतातच, असे नाही आणि ह्यामुळे ह्या शास्त्रांचे महत्व त्यामुळे कमी नव्हे तर विश्वास ठेवण्या इतपत नाही. हे मान्य केलेच पाहिजे. दुसरे असे की वैद्यक शास्त्रात सुद्धा डॉक्टर जितका निष्णात, तितके त्याचे रोगनिदान अचूक असते. डॉक्टरचे रोगनिदान चुकले म्हणून वैद्यक शास्त्र खोटे किंवा चूक ठरत नसते. त्याचप्रमाणे, ज्योतिष शास्त्रज्ञ जेव्हढा निष्णात, तितके त्याने वर्तविलेले भविष्य, विशिष्ट घटने आणि काळा संदर्भात तेवढ्यापुरते सत्य असते, तेव्हढ्याच चौकटीत खरे असते.

पारंपारिक विचार आणि बुद्धिवाद

परंपरा म्हणजे काय, हा प्रश्न प्रथम समजून घेण्यासारखा आहे. प्रत्येक माणूस हा आपल्या बरोबर जन्मत:च अनुवांशिक hereditary गुण-दुर्गुण घेऊन जन्माला येत असतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. ही अनुवंशिकता ह्यालाच अध्यात्मामध्ये आधिभौतिक म्हणतात, असं माझं मत आहे.
                दुसरा भाग म्हणजे जन्मत:च फ्राईडच्या मानसशास्त्रानुसार प्राणिजात उत्क्रांतीचे अंश आपल्या बरोबर घेऊन जन्माला येत असतात.
               तिसरा भाग म्हणजे ह्या वरील दोन्ही भागांचे एकत्रित असे अनेक समूह आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या म्हणजे मेंदूच्या रचनेत समाविष्ट होऊन आपण जन्म घेत असतो.
                ह्या तिन्ही भागांचा मिळून जो कोष तयार होत असतो, त्याला स्मृतिकोष म्हणतात. स्मृतिकोष हा सतत, सातत्याने आणि सदैव जागृत असतो. झोप-निद्रा, बेशुद्ध आणि कोमा ह्या तिन्ही अवस्थेत वेगवेगळ्या पातळ्यांवर हा कोष अस्तित्वात रहात असतो.
                परंपरा म्हणजे ह्या दृष्टीकोनातून स्मृतिकोष हा एक वैचारिक, तात्त्विक, तर्कनिष्ठ आणि संवयीचा असा भाग आहे. म्हणजे असं की आपल्या धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आणि पिढ्यानपिढ्या संस्कारित असा एक भाग आहे. ह्याच्यावरून आपले व्यक्तिनिष्ठ, व्यष्टीधारक आणि अत्यंत सूक्ष्म असे एक व्यक्तित्व विकसित होत असते. तसेच, आपले कौटुंबिक, सामाजिक, समूहवाचक, आर्थिक, राजकीय आणि समष्टीधारक व्यक्तिमत्व विकास पावत असते.
                   ह्यावरून असे दिसते की पारंपारिक विचारसरणीवर मुख्यत: प्रभाव,  पिढीजात संस्कार व सामाजिक विचारांचे असतो.  पिढीजात संस्कार म्हणजे पारदर्शीपणे जाणवणारे आई-वडील व इतर नातेवाईक. ह्यांचे आचार-विचार विश्व होय. ह्या पारदर्शी विचारसरणीच्या साकल्याने आपलाही एक वैचारिक गाभा तयार होत असतो. पण व्यक्ती पातळीवर प्रत्येक व्यक्तीवर आधुनिक विचारसरणी, शिक्षण, मित्रमंडळ, समाज, राजकारण, आर्थिक क्षमता इत्यांदिंचा प्रभाव अधिक मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे व्यक्तिमत्व तयार होत असते. अशा प्रकारे आपल्या बाह्य भवतालाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव  आपल्या व्यक्तिमत्व विकास क्षमतेवर होत असतो. तदनुसार, काहींचे व्यक्तिमत्व बाह्य संस्कारित अधिक झाल्यामुळे अशा व्यक्ती extrovert किंवा introvert होतात. Extrovert व्यक्ती बाह्य संस्कारांमुळे व्यक्त होताना open minded, हजरजबाबी, आणि आक्रमक होत असतात. तर introvert व्यक्ती फारश्या बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, सतत विचार करीत राहतात, कुढत राहतात आणि काही वेळा,apparent or latent or hidden मनोरुग्ण होतात.
               साहित्यिक व कलेच्या क्षेत्रातील लोक संवेदनशील, सर्जनशील आणि सृजनशील असतात. त्यांच्यावर समाजशील माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून दोन्ही अस्तित्वाचा प्रभाव असतो. त्यांची जडणघडण इतर लोकांप्रमाणे होत असते. त्यांच्यावरही परंपरा, संस्कृती, इ इ वरील मानवी मनाच्या व बुद्धीच्या रचनांचा प्रभाव असतो. त्यामुळे, आशा-निराशा, सुख-दुख: इ द्वंद्वे, पारंपारिक आचार-विचार इ चे  परिणाम त्यांच्यावर ही होत असतात. साहित्यिक व कलावंत ह्या सर्व परिणामांचा, द्वंद्वात्मक जगाचा, आणि स्वत:चा भावनात्मक अर्थ लावू शकतो. ही अर्थ लावण्याची त्याची क्षमता किती सखोल, सदृढ, जाणीवेच्या-नेणीवेच्या पातळीवर स्थिर-अस्थिर असते, आणि ह्या क्षमता शब्द, चित्र, शिल्प इ माध्यमातून तो कसा मांडू शकतो....ह्यावर त्याची प्रतिभावंत प्रज्ञा विकसित होत असते.