Thursday, 23 December 2021

समाजभान

 माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती कौटुंबिक आणि सामाजिक परिप्रेक्षात घडत असतात. सामाजिक परिप्रेक्ष म्हणजे लोकांची मते, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टींवरून आपली मते घडत जातात. परंतु आपण जेव्हा आपल्या व्यक्तिगत धारणा, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टी आपण सामाजिक विचार प्रवाहांच्या संदर्भात तपासून न पाहता जशाच्या तशा स्वीकारतो ,तेव्हा आपण प्रवाहपतित होत असतो. 

                     मुळात आपण हे समजून घेत नाही की मी ही एक स्वतंत्र व्यक्ती असून, समाजाचे आणि माझे नाते काय आहे ? त्यामुळे, लोकांच्या मतांवरून ठरविलेली आपली अनुमाने, निष्कर्ष किंवा संकल्पना चुकीच्या आहेत, हे जेव्हा सिद्ध होते; तेव्हा मात्र आपल्या एकट्यालाच चुकलेल्या गोष्टींची फळे भोगावी लागतात. आपली मते, विचार, संकल्पना आपण किती प्रमाणात समाजाकडून मान्यता घेऊन सत्य - असत्य ठरविणार? ह्याचे भान न ठेवल्यामुळे जे काही भोगावे लागते, त्याला समाज नाही, तर आपण एकटेच जबाबदार असतो.

                       समाज आणि मी ह्यांचे नाते विविध पातळींवर कार्यरत असते आणि हे नाते नेहमीच एकोप्याचे नसते. कारण समाज ज्या विचारप्रवाहांवर कार्यरत असतो, त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर आपली वैयक्तिक जडणघडण झालेली असते. समाजाची मते ही बहुसंख्याक वादी असतात. ह्या बहुसंख्याकात वैयक्तिक विचार करणारे आणि त्या विचारांप्रमाणे समाजा बरोबर जाणारे अधिक असतात आणि विरुद्ध जाणारे फार थोडे असतात. कारण प्रत्येक माणसाची मनोबुद्धी एकसमान नसते. परंतु ज्याला ह्याची जाणीव असते की माझी प्रज्ञा, बुद्धी ही समाज म्हणतो, त्या विरुद्ध आहे; त्याला म्हणजे त्या व्यक्तीला समाजभान आहे, असे म्हणतात. 

                   थोडक्यात,समाज काय म्हणतो आणि मी काय म्हणतो; ह्यातील अंतर म्हणजे समाजभान होय.

                                                                   **************

Sunday, 12 December 2021

आत्मविश्वास

 आत्मविश्वास हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. हे व्यक्तिमत्व ज्या प्रमाणात विकास पावत जाते, त्या प्रमाणात ती व्यक्ती इतरांना प्रभावित करू शकते. त्यामुळे ती व्यक्ती इतरांचा विश्वास संपादन करून घेऊ शकते. ह्यामुळे ती व्यक्ती लोकप्रियतेची एकेक शिखरे पादाक्रांत करत जाते. त्या बरोबर सदर व्यक्तीचा इतर लोकांबद्दल वाटणारा विश्वास वाढत जातो. ह्याच लोकप्रियतेचा उपयोग आणि दुरुपयोग राजकीय पक्ष करून  घेऊ लागतात. त्या व्यक्तीला पक्षातील विविध पदे बहाल करणे, विविध ठिकाणी मिरवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, शासकीय विविध सांस्कृतिक समित्यांवर वर्णी लावणे, विविध प्रशस्ती पत्रे, विविध पुरस्कार, बक्षिसे इत्यादी गोष्टींचा वर्षाव करून सदर व्यक्ती सतत प्रसिद्धीच्या झोतात, विशेषत: पक्षांकित वृत्तपत्रे, मासिके इत्यादी मार्फत, सतत प्रसिद्धी माध्यमातून झळकत ठेवली जाते.. मग त्या व्यक्तीला वाटू लागते की मी आता नेता झालो आहे...कारण लोक ह्यांचे ऐकतात. ह्यांचा शब्द झेलण्यास तयार होतात. मग हळूच स्थानिक निवडणुकीचे तिकीट बहाल केले जाते. निवडून जिंकण्याचे प्रशिक्षण, पैशाचा वापर, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे, त्याच्या खाजगी खऱ्या खोट्या प्रसारित करणे इत्यादी इत्यादी....ह्यातून सदर व्यक्तीला इतका आत्मविश्वास वाटू लागतो की प्रत्येक निवडणूक ही इर्षा होऊन जाते. आत्मविश्वास इतका बळावून जातो की तो अहंकार, गर्व, दर्प, आढ्यता, उर्मटपणा, उद्धटपणा कधी होऊन जातो, ह्याचा पत्ता त्या व्यक्तीला लागत नाही. अखेर अशी व्यक्ती राजकारणी होऊन जाते. 

                             व्यक्तिमत्व विकासाच्या एका टप्प्यावर अशी व्यक्ती पोहोचते, तेव्हा एकतर वर म्हणल्याप्रमाणे ती  राजकीय नेता बनून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीबद्दल लोकांना खात्री वाटू लागते की ही व्यक्ती विश्वासू आहे. ती आपला विश्वासघात करणार नाही. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुळात आत्मविश्वास ह्या शब्दाचे गांभीर्य आपण जाणून घेत नाही. इथे आत्मा ह्या शब्दाचा विस्तार होऊन आत्मविश्वास हा शब्द तयार झाला आहे. इथे आत्मा म्हणजे अंतर्मन....आतला आवाज. हा आवाज...दैवाधीनता स्वीकारत असतो की मला मिळणारे यश हे माझे कर्तृत्व आहे ! देवाने मला मिळालेली देणगी आहे! इथेच खरी फसगत चालू होते. कारण आत्मविश्वास कसा विकसित झाला.? कोणी विकसित केला? का केला? ह्या प्रश्नांना समोर जायचे धाडस तीच व्यक्ती करू शकते, जिला अंतर्मन, अंतरात्मा म्हणजे काय आणि त्याचा संबंध आपल्या आत्मविश्वासाशी कसा आहे....ह्याची जाण असते.

                               अशी जाण अपोआप निर्माण होत नसते,कारण अध्यात्म साधनेत आत्मा + विश्वास हे अत्यंत कळीचे ( critical ) अनुभव आहेत. गुरु -शिष्य हे नाते द्वंद्वात्मक आहे...हे वास्तव आहे. पण जेव्हा हे नाते पूर्ण विकसित होते, तेव्हा मी - तु पणा गुरु - शिष्यामध्ये रहात नाही. ह्यालाच रामदास स्वामी " समर्पण " भाव म्हणतात. ही अवस्था म्हणजे ह्या ' हृदयीचे त्या हृदयी ' अपोआप म्हणजे नकळत होऊन जाते.  शिष्याचे गुरु सर्वस्व होऊन जातात. तेव्हा आप पर भाव, मी -तु पण, सर्व विसर्जित होऊन जाते.

                                                                    ********************