मी लिहितो, बोलतो किंवा वागतो, ही साहित्यिक बाब नाही किंवा तो माझा कुठल्याही प्रकारचा साहित्यिक आविष्कार
नाही. कारण माझ्या नावावर कसलीही साहित्यिक पदवी नाही. कसलाही लेख,निबंध,कथा-कादंबरी, समीक्षा असं काहीही मी लिहिलेलं नाही. थोडक्यात, माझे लिखाण कोणत्याही साहित्यिक मापदंडावर टिकणारे नाही. पण
मी माणूस आहे व माणुसकीचा छोटासा का होईना, सेवक आहे.प्रस्थापित व्यवस्थेतील मला अन्यायकारक वाटणा-या, माझी भावना, परम, माझ्या जीवन-साधनेला अनुपकारक असणा-या गोष्टीबद्दल, प्रस्थापित नात्यांबद्दल, नात्यांच्या मूल्य-धारणेबाबत माझा विरोध प्रगट करण्याचा मला अधिकार आहे व तो मी माझ्या केवळ
लेखणी मार्फतच मी व्यक्त करू शकतो. मला नेता व्हायचे नाही की
चळवळींचा कार्यकर्ता व्हायचे नाहीयेय की साहित्य निर्मितीत सहभागी व्हायचे नाहीयेय. मला व्यक्त होण्याचे साधन लेखणी आहे. ती फक्त माझ्यासाठीच आहे.त्यामुळे मला वाचकाची अपेक्षा नाही, असे मात्र नाही. माझ्या शब्दांच्या पलीकडे असणा-या मला वाचू शकणाराच,
माझा वाचक असेल. तो किंवा ती वाचक इतकी सक्षम व समर्थ असेल की माझ्या
लेखनाच्या सामर्थ्यापलीकडे असणारा अव्यक्त मी समजून घेणारा / घेणारी
असेल, ह्याची मला खात्री आहे.
“मी“ च्या वाढलेल्या परिघात आई-वडिल,जोडीदार,मुलें,शेजारी-पाजारी इ सामावलेले आहेत व त्यांनीच माझी भावनिक श्रीमंती वाढवली आहे.
सुख-द:खांच्या प्रसंगी निकटच्या नातेवाइकांआधी मदतीला धावतात, ते माझे शेजारी, श्री व सौ चव्हाण, कुळकर्णी आजी इ. ह्या शेजारधर्माचा मूळ स्रोत एकमेकांच्या मनोभावनेपेक्षा संवेदनशीलतेच्या विकासामध्ये असतो. अशी संवेदनशीलताच “मी“चा परिघक्षेत्र अधिक समृध्द करीत असते.
प्रथमदर्शनी एकमेकांबद्दल अनुकुल मत तयार होत नाही; कारण मनाच्या संवेदनशीलतेला स्पर्श करण्याची व आवाहन-आव्हान देणा-या अनुकूल काळाची गरज असते.एकमेकांचा परिचय वाढणे व तो समृध्द होणे, ही काळाच्या कसोटीवर सिध्द होणारी आवश्यकता असते.आपल्यातील “मी“ला जाणून घेणारी शक्ती समजणे, ही साधी गोष्ट नसते, मग दुस-याला समजून घेणे किती अवघड आहे, हे कळते.पण ह्या सर्वांवर मात करणारा, सर्वांना जवळ आणणारा आणि दूर नेणाराही काळच असतो.
अनेकदा आपली एकमेकांच्या विचारांबद्दल, विचार-आचारसरणी बद्दल कमालीची मतभिन्नता असते, तरीही परस्परांबद्दल संवेदनशीलता असेल तर ही मतभिन्नताही परस्परांबद्दल अनादर निर्माण न करता आदरच निर्माण करते. पण हया करीता काळाबरोबरच आपणही किती परिपक्व झालो आहोत, हेच खरं अत्यंत महत्वाचे असते.
मला शब्दातून व्यक्त व्हायला आवडतं. पण शब्दांच्या मर्यादाही मला कळतात. आणि असं स्पष्टपणे जाणवतं की मुक्या भावना, मनाचे भावबंध, संवेदनशीलता, मनाची गूढता-अगम्यता….ही सारी मौनाची भाषा व्यक्त होण्यासाठी मी सदेह व्यक्त होणे आवश्यक असते. त्यासाठी घडणारा अभिनय, हा माझ्या देहबोलीचा अविष्कार असतो.
मी नात्यांना इस्टेटीपेक्षा जास्त जपण्याचा प्रयत्न करतोय. आजकाल मात्र इस्टेटीच्या वाटणीपायी नात्यांचे तुकडे होत आहेत, हे विदारक वास्तव मला अस्वस्थ करते.ही अस्वस्थताच मला गोसावी परिवार संमेलन घडवून आणण्यासाठी प्रेरणा देत असते.
“नाहं वसामि वैकुंठे, योगिनां रवौ.
मद्भक्त्या यत्र गायन्ति, तत्र तिष्ठामि, नारद.“
मी वैकुंठात राहत नाही.भावभक्तीने गाणा-या भक्ताच्या र्हदयात मी साकार असतो.किंवा जिथे माझा भक्त भावभक्तीने गात असतो, तिथे मी हजर असतो.तात्विक,ललित आणि विदग्ध असे वाङमयाचे तीन प्रकार आहेत. रागसंगीताच्या तात्विक पायावर रसिकांनासह स्वत:ला प्रसन्नता देणारे गीतकार, गायक आणि संगीतकार ह्यांच्या विदग्ध आविष्कारातून जी निर्मिती होते, ती म्हणजे प्रतिभेचा प्रसाद होय.
स्वरांकित शब्द हा भावगीताचा आत्मा आहे.शब्दांकडून अर्थापेक्षा भावरम्यता ही भावगीताची अपेक्षा असते.
बोलणे, संभाषण आणि वक्तृत्व ह्या कला आहे व त्यांचे संवर्धन एकमेकांच्या सहचर्यातूनच होत असते.म्हणून बोलणे हा केवळ व्यवहारातील उपचाराचा भाग नसतो.बोलण्यातून भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा ह्यांचे व पर्यायाने समाजाचे उन्नयन होत असते.म्हणून वाग्देवतेची पूजा करण्याची संस्कृती विकसित होणे, ही आजच्या काळाची ज्वलंत गरज आहे, असं मला वाटतं.तरीसुद्धा हे सत्य स्विकारले पाहिजेच की खरं ज्ञान हे गुरुमुखातूनच प्रगट होत असतं व सर्वोत्तम ज्ञानार्जन गुरुकडूनच होत असतं.
समर्थांच्या “अभ्यासोनि प्रगटावे ! नाहीतर झाकोन असावे“ ह्या उक्तीचा माझ्यावर चांगलाच प्रभाव आहे. ह्याचे कारण आजच्या समाजात अनेक विषय उगाचच, अकारण, भावनिक व संवेदनशील झाले आहेत. त्यामुळे तर्कशुध्द विचारांचे व निवेदनाचे महत्व खूप कमी झाले आहे. व्यक्ती आणि विचार विद्वेषामुळे समाज ख-या ज्ञानापासून वंचित होऊ लागला आहे.मनोरंजनाला अनन्य, असाधारण महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे वाङमयीन शोकांतिका अशी होऊ लागली आहे की सर्व कलांची आणि साहित्यप्रकारांची लोकप्रियता हा मानदंड झाला आहे.
अलीकडे असेही दिसू लागले आहे की समाजातील प्रत्येकजण स्वकेंद्री बनत चालला आहे. पण ही स्वकेंद्रीयता स्वत:च्या केंद्राकडील नसून स्वत:च्या संकुचित व क्षुद्र स्वार्थात अडकली आहे. आर्थिक सुरक्षित व संरक्षित कवच लाभले की जगाच्या कोणत्याही चिंतेची गरज राहिलेली नाही.त्यामुळे कळवळा, करुणा असणा-यांची मनुष्य-जात दुर्मिळ होत चालली आहे. संवादोत्सुकता कमी झाली आहे, तर कुटाळ गप्पा-गोष्टी, पचापचा बोलणे, गप्पाष्टके, कशावरही, कोणत्याही विषयावर तोंडसुख घेणे, ह्या वृत्ती आणि प्रवृत्ती नुसत्या वाढलेल्याच नाहीत तर माजल्या आहेत. अंतरीचे निर्मळ झरे आटत चालले आहेत व एक भयानक प्रकारचे भावनिक ओसाडपण पसरत चालले आहे.
माझेच नव्हे तर प्रत्येकाचे दुस-यांबद्दल खूपच समज-गैरसमज असतात. पण माझेच माझ्याबद्दल अनेक, असंख्य गैरसमज असतात व ते दुस-यांकडूनच दिग्दर्शित होत असतात. खरं म्हणजे समज-गैरसमज आपल्याच सुख-दु:खांतून निर्माण होत असतात. चांगले समज सुखात जातात, तर गैरसमज दु:खांच्या निर्मितीचे स्तोत्र असतात.
विसंगती हा भौतिक जीवनाचा स्थायीभाव आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत माणसे, मित्रमंडळी आणि स्वत: मी ह्या शब्दांचा अर्थ शब्दकोशात सापडावा, म्हणून धडपड करीत असतो. प्रत्यक्षात मात्र तो अर्थ संदर्भाप्रमाणे सतत बदलत जात असतो, किंबहुना त्या अर्थाचा अनर्थच प्रत्ययाला येतो, हीच खरी माझी शोकांतिका आहे.
**************
**************
No comments:
Post a Comment