(१) जीवनाला आधारभूत असणारा
आणि जीवनातील विविध व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक वाटणारा एखादा अढळभाव व्यक्तिजीवनात असेल, तर त्याला श्रद्धा हे नाव देता येईल. माणसाचे व्यक्तिमत्व, अस्तित्व आणि अस्मिता
यांचा समन्वय साधणारा कोणताही भाव श्रद्धा हा संज्ञेस पात्र ठरतो. रवींद्रनाथ टागोर श्रद्धा ही एक भावना आहे असं म्हणताना
लिहितात-“श्रद्धा ही सुखद आशावादाची सनई आहे.”
अंधश्रद्धा म्हणजे काय, हे सुद्धा लक्षात घेतलं
पाहिजे-“श्रद्धेवर स्वार होऊन विवेक व बुद्धीला जवळ न
करणे.” विवेक व बुद्धी ही प्रयत्नवादाची प्रमुख साधने. पण श्रद्धा म्हणजे प्रयत्नवादाच्या विरोधी भूमिका नव्हे. कारण श्रद्धासुद्धा प्रयत्नपूर्वक ठेवली पाहिजे. तौलनिक विचार, विवेक आणि व्यवस्थापन
कौशल्य ह्यांच्यासह श्रद्धा जपली पाहिजे. कारण लौकिक सत्याची
स्वाभाविकता ईश्वरी तत्वांशी विसंगत नाहीयेय. म्हणूनच श्रद्धा व श्रद्धेय काय असले पाहिजे याचे साक्षेपी
मार्गदर्शक सद्गुरू असणे, ही अध्यात्म साधनेची
अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. गुरुगीतेमध्ये भगवान
शंकरांनी म्हणले आहे-
दुर्लभम त्रिषुलोकेशु तत शृणुश्व वदाम्यहं |
गुरुम विना ब्रम्ह नान्यत सत्यं सत्यं वरानने ||
तिन्ही लोकांत दुर्लभ असे
हे साधन आहे, ते मी तुला सांगत आहे. (पण लक्षात ठेव) हे पार्वती, गुरु शिवाय ब्रम्ह(ज्ञान) मिळणे अशक्य आहे; हे सत्य आहे, हे सत्य आहे.
गुरु हा मार्गदर्शक असतो, पण तरीही प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनाच्या केंद्राकडे
जाताना ‘मी कोण आहे?’ हा शोध घेणारा भाव, असा शोध घेणारी विचारधारा
म्हणजेच श्रद्धा होय. म्हणूनच श्रद्धा
व्यक्तीनिष्ठ असते; ती सामाजिक, राजकीय, साहित्यिक, किंवा कौटुंबिक पातळीवर, पटलावर आणि परिमाणामध्ये सामावणारी व्याख्या नाही. ती असते ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असे म्हणणारी ज्ञानदेवांची अनुभूती असते.
************
************
No comments:
Post a Comment