Sunday, 29 June 2014

इतिहास: समाज-सुधारणा आणि राजकारण-एक अभ्यास

                                     

इतिहास म्हणजे केवळ घटना आणि त्याचा आलेख नव्हे. माझ्या दृष्टीने इतिहास म्हणजे एक वैचारिक कालखंड....त्यामधील समाज-रचना, आदर्शवाद, नीती-नियम, न्याय-संस्था इ. घटकांची मींमासा होय.
लो.टिळक, गोपाल गणेश आगरकर, गोपाल कृष्ण गोखले, न्या रानडे ह्यांचा काळ म्हणजे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विचार- आचारांचे अभिसरण होते.
             
                 इतिहासकार राजवाडेनी ह्या कालखंडातील लो.टिळक आदि विचार-आचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या आणि नेत्यांच्या जीवनपटाचा सखोल अभ्यास करून जे निष्कर्ष काढले आहेत ते आजही लागू आहेत. लो. टिळकांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्य ह्या आपल्या संकल्पना विकसित केल्या, आणि त्यांना राजकीय आणि राजकारणासाठी सक्षम क्षेत्र मानून त्याप्रमाणे आपली जीवनप्रणाली बांधली. धर्म आणि समाज-सुधारणांना त्यांनी गौणस्थान दिले आणि समाज-सुधारकांशी ब-याच मोठ्या प्रमाणात "वैर" संपादन केले. पण त्यांच्या मनात आगरकर -रानडे-गोखले ह्यांच्या बद्दल वैरभाव मात्र नव्हता.

                लो.टिळकांनी धर्म आणि धार्मिक-सामाजिक आचार-विचारांना फारसा धक्का न लावण्याचे तंत्र विकसित करताना समाज-सुधारकांशी  "वैर" पत्करले. कारण त्यांच्या मते स्वातंत्र आणि स्वराज्य मिळवायचे असेल तर लाकानुनय, बहुमताचा कौल आणि तत्संबधित जहाल रेटा (aggresive pull & push) आवश्यक होता. लो.टिळकांना धार्मिक-समाजिक सुधारणा नको होत्या, असे नव्हते. पण ह्यासाठी त्यांना ब्रिटीशसत्तेची लुडबुड नको होती आणि बहुसंख्य समाजाला दुखवायचे नव्हते. त्यासाठी त्यांनी कमालीची जहाल भूमिका घेतली. पण त्यामुळे त्यांना आगरकरांसारख्या जिवलग मित्राचा बळी द्यावा लागला. एव्हढेच नव्हे तर आपल्या कुटुंबियांच्या कल्याणकारी स्वास्थ्याचाही कठोरपणे त्याग करावा लागला.

           इतिहासकार राजवाडे ह्यांच्या मते लो.टिळकांची ही भूमिका आणि त्यांनी आचरण केलेली जीवनप्रणाली ज्या कर्मवादाच्या सिद्धांतावर आधारित होती, तिची व्यापकता अध्यात्मिक अंगानी जाणारी होती तरीही ती त्या काळापुरतीच मर्यादित होती आणि तेव्हढ्यापुरतीच यशस्वी झाली. स्वातंत्र्य व देशप्रेमाचा उठाव आणि क्रांती  म. गांधीच्या प्रेरणेने आणि कार्यांनी झाली, हा इतिहास आहे. लो.टिळक, स्वा. सावरकर. सुभाषचंद्र बोस, आणि अनेक हुतात्मांचे बलिदान ह्याच्यामुळे पायाभरणी झाली. इ.राजवाडेनी ह्या मीमांसेकारिता समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या अन्योन्य आणि समन्वयवादी संबंधांचा आणि तत्कालीन राजकारण ह्यांचा उपयोग केला आहे. त्यांच्या मते संत संप्रदाय आणि समाज-सुधारकांनी सामाजिक व्यवस्था विस्कळीत केली. त्यामुळे परकीय सत्तांना आपले स्थान मजबूत करता आले.

            शिवाजीराजेंच्या काळात समर्थ रामदासांनी मात्र कडव्या धार्मिक परंपरावादाला धक्का न लावता स्वातंत्र्य आणि स्वराज्य स्थापनेला सक्षम मदत केली. गोसावी-बैरागी-कीर्तनकार इत्यादींचे जत्थेच्या जथ्ये निर्माण करून त्यांना राजकारणाच्या आखाड्यात आणले; शिवाजीराजेंचा राज्य-शकट चालविण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना राज्य-व्यवस्थेमध्ये मानाचे स्थान दिले. नंतरच्या काळातही न्या.रामशास्त्री प्रभुणे आदिंनी राज्य आणि न्याय व्यवस्थेमध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि हे सर्व करताना त्यांना समाज-रचनेची मोडतोड करावी लागली नाही. मुसलमानांना शह देण्यासाठी समाजाला प्रवृत्त केले. समाजसुधारकांप्रमाणे समाज-रचनेला काव्यात्मक-भावनिक न्यायाची बिरुदावली लावावी लागली नाही की त्याकरिता आंदोलने करावी लागली नाही; धार्मिक-समाजिक परंपरांना आव्हानं द्यावी लागली नाहीत. जाती-वर्णभेदासहित असलेली समाज-व्यवस्था आणि रचना यांची मोडतोड करावी लागली नाही. किंबहुना अशा समाजाला परकीय सत्तेबद्दल आक्रमक आणि लढाऊ बनविण्याच्या प्रक्रियेला समर्थांच्या शिकवणुकीचा प्रचंड लाभच झाला.
(आधार-"रानडे विरुद्ध राजवाडे" डॉ सदानंद मोरे. सकाळ साप्ताहिक ५.७.२०१४.)
                                                   *************


No comments:

Post a Comment