मानवी आयुष्य हा एक संग्रह आहे. ह्यामध्ये दोन घटक आहेत. एक आहे जगणे आणि दुसरा घटक आहे, जीवन. जगणे, ही प्रक्रिया आहे तर जीवन घडविले जाते. त्यावरून जीवनवाद म्हणजे व्यक्तीच्या चारित्र्याची वैचारिक, सैद्धांतिक, मानसिक आणि वास्तविक प्रणाली किंवा मांडणी आहे.
जगणे आणि जीवन ह्या दोन्ही
स्वरुपात आयुष्य सरत असतं. पण जगण्यामध्ये असणारी आयुष्याची जडण-घडण हा नैसर्गिक
आणि वास्तव अशा गोष्टींचा संग्रह असतो; तर जीवन हे आयुष्यातील
अटळ-अनिवार्य अशा घटकांचे संकलन असते. म्हणजेच असं की जगणे हा आयुष्याच्या
प्रक्रियेमधून निर्माण होणारा संग्रह आहे तर जीवन हे संकलन आहे. संग्रह ही केवळ
साठवण आहे तर संकलन हे संस्कार संपन्न संपादन आहे.
माणसाच्या चारित्र्याला जगण्याचा
परिप्रेक्ष (perspective) असतो; तर जीवनाला चरित्र (इतिहास) आणि चारित्र्य (चरित्रात्मक
संस्कार) ह्या दोन्हींचा संदर्भ आणि
परिप्रेक्ष असतो. चरित्र हे घटनांशी बद्ध असते, तर चारित्र्य हे घटनांचे मनावर
झालेल्या संस्कारांवर बद्ध असते. उदा. गांधीजींच्या आयुष्यातील दक्षिण ऑफ्रिकेतील
घटना हा त्यांच्या चरित्राचा भाग आहे, तर त्या
घटनांनी त्यांच्या आयुष्यावर झालेले परिणाम हा त्यांच्या चारित्र्याचा भाग आहे.
चरित्र हा आयुष्याचा अनिवार्य आणि अटळ असा घटनात्मक भाग आहे, तर चारित्र्य हा
आयुष्य घडविताना झालेल्या संस्कारांचा भाग आहे. म्हणून असे म्हणतात की मानवी
जीवनाच्या संदर्भात व्यक्तीचे आयुष्य किंवा जगणे हा महत्वाचा किंवा नोंद घ्यावा, असा संदर्भ नाही; पण व्यक्तीच्या जीवनाचा संदर्भ
निश्चितपणे मानवी इतिहासाच्या व संस्कृतीच्या आविष्काराला आवश्यक असा घटक असतो.
उदा. श्रीकृष्ण ह्या व्यक्तीच्या जीवनाचा संदर्भच नव्हे मानवी जीवनाचा संपूर्ण
परिप्रेक्ष श्रीकृष्ण ह्या अभिव्यक्तीने व्यापून टाकलेला आहे. म्हणून असे म्हणतात
की जगण्याला व्यक्ती संदर्भ आहे, तर जीवनाला अभिव्यक्ती हा संदर्भ व परिप्रेक्ष
आहे.
मानवी आयुष्याचा अत्यंत मौलिक आणि
महत्वाचा घटक आहे, शिक्षण. असं म्हणतात की जगण्यात जर
शैक्षणिक मूल्य असेल, तर ते जीवन घडविण्याचे सूत्र असते. ह्याचे
कारण मानव हा केवळ प्राणी नसून तो सतत सातत्याने जे पहात जातो, अनुभवत जातो; त्या प्रत्येक
अनुभवाचा, घटनेचा एक स्मृतिकोष त्याच्या
आयुष्याचा अनिवार्य व अटळ असा भाग बनून जातो. त्यातून जी बौद्धिक आणि मानसिक
प्रक्रिया घडते, ती म्हणजेच संस्कार किंवा शिक्षण
होय.
शिक्षण आणि संस्कार ह्यांच्यात मुलभूत
भेद हा आहे की संस्कार हे घडत जात असतात. कारण मानवी मनाच्या व बुद्धीच्या
प्रक्रियेचे संस्कार हे अनुस्यूत असे अंग आहे, आणि हे अनौपचारिक (informal) आहे. शिक्षण ही सुद्धा मानसिक आणि बौद्धिक
प्रक्रिया आहे, पण ती औपचारिक (formal) आहे. ह्याशिवाय, शिक्षण हा संस्कारपूर्ण मानवी अविष्कार आहे, असं म्हणतात, ते अर्थपूर्ण
आहे. कारण शिक्षणात जितकी अनौपचारिकता असेल, तितके असे
शिक्षण अधिक अर्थपूर्ण, सदृढ व संपन्न असते. ज्या काळात शिक्षण हे शाळांतर्गत
नव्हते; व्यक्तीभूत किंवा वैयक्तिक पातळीवर
दिले जात असे; तेव्हा त्या शिक्षणाला शिकवणी
म्हणले जायचे आणि त्यातून गुरु-शिष्य असे नाते व शैक्षणिक परंपरा निर्माण झालेली
होती. अजूनही असे प्रयोग काही ठिकाणी होत आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे आणि मौलिक
आहेत.
***********
No comments:
Post a Comment