Friday, 4 October 2024

मी कोण आहे ?

 

                                                     मी कोण ?

मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मी कोण होतो? आई-वडील ह्यांच्या गुणसूत्रांत विलीन असे वास्तव होतो. वास्तव म्हणजे वस्तुरूप अस्तित्व. पण त्या मी असण्याला काही अर्थ नव्हता, आकार नव्हता. पण तरीही मी होतोच ना? तर हा मी त्यावेळी, त्या काळात आणि स्थळात (time & space) एक भास होतो. एक बिंब होतो.

           आईच्या उदरात मी गर्भ म्हणून जेव्हा जीव झालो, तेव्हा मला आकार आला....पण तरीही मी जगाच्या दृष्टीने मी निराकार होतो....निरर्थक होतो.....मग मी कोण होतो? गर्भ म्हणून माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय होतो? मी गर्भ....हा माझ्या आई-वडिलांच्या गुणसूत्रांचा आविष्कार होता. आई-वडील स्वत: कोण होते, माझ्या गर्भधारणेत? आई-वडील गुणसूत्र रूपाने भास होते, दोन बिंबे होती आणि मी तेव्हा ह्या भासांचा आभास होतो, प्रतिबिंब होतो.

           थोडक्यात, मी हा विशिष्ट काळात आणि स्थळात (time & space) मुलत: भास किंवा आभास, बिंब किंवा प्रतिबिंब असतो. हे विश्व म्हणजे मुळात भास आहे, माया आहे.....असे वेदांनी म्हणले आहे. कारण विश्वाचा निर्माता आकाशगंगा आहे....ह्या आकाशगंगेत अनेक विश्वे, ब्रम्हांडे आहेत.....पण जो पर्यंत त्यांना स्वतंत्र वस्तू रूपाने अस्तित्व नाही, आकार नाही....तोपर्यंत ही सर्व विश्वे भासमय आहेत.

          अशा प्रकारे मी हा भास आहे. तर मग मी-माझे-मला, तुझे-तुझ्यासाठी-तुला हा सर्व ह्या आभासाचा पसारा आहे....म्हणून माझे तुझे हा संकीर्ण आभास आहे. वेदा पंडीत म्हणते, माझा विस्तार म्हणजे माझेपण आणि तू-तुझेपण आहे....हे एकमेकांवरील थर आहेत......म्हणून ते आभास आहेत......मी हा मुळात भास आहे, हे मला जाणवते....ही निर्गुणावस्था आहे. निराकार...मला आकार नाही, रूप नाही.....ही जाणीव म्हणजे विदेहावस्था आहे. अध्यात्मामध्ये ह्या अवस्थेला, निद्रा ह्या अवस्थे पलीकडील तुर्यावस्था म्हणतात. झोप-निद्रा-सुषुप्ती ह्या तात्कालिक म्हणजे स्थळ-काल (time & space) सापेक्ष अवस्था आहेत. तुर्यावस्था मात्र स्थळ-काळ सापेक्ष नसली तरी निर्विकल्प म्हणजे संकल्प, इच्छा, अपेक्षा नसताना घडणारी एक अवस्था आहे. आध्यात्मशास्त्रात ह्या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. समाधी म्हणण्याचे कारण असे की ह्या अवस्थेत मी ची जाणीव असली तरी मी देह, मी शरीर हे भान लुप्त झालेले असते. समाधी अवस्थेत शरीर काष्ठवत होऊन गेले, तरी त्यात प्राण असतो......पण तो चैतन्य रूपाने नसतो. प्राण हा मुळात चैतन्य आहे. पण त्याला शून्यावस्थेत स्थिर राखणे जपणे.....ही योगविद्या आहे. योगीजन ती आत्यंतिक, खडतर, अखंड, आणि निरंतर साधनेने साध्य करू शकतात.

         ह्या पलीकडील अवस्था म्हणजे सविकल्प समाधी.....ज्ञानेश्वर माऊलीनी घेतलेल्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. कारण त्यांनी समाधी घेण्याचा संकल्प केला विधिवत समाधी अवस्थेत, काळ-स्थळ सापेक्ष असा, प्रवेश केला देहत्याग केला. मी भास असून ह्या भासाला मी पाहतो...तेव्हा तो माझ्या अंत:करणात प्रतिभास-आभास-प्रतिबिंब चे अनुबंध  असतात. ह्या संकीर्ण अशा भास-आभास-बिंब-प्रतिबिंब असलेल्या जगाला सोडून निर्द्वंद्व होणे.....म्हणजे द्वन्व्दातीत होणे....म्हणजेच अद्वैत होणे.....विश्वमय होणे....विश्वात्मक होणे.

         द्वैत म्हणजे मी आणि माझेपण, मी आणि तू, मी आणि जग, सुख आणि दुख:, स्त्री आणि पुरुष, देव आणि दानव, देव आणि माणूस, सजीव आणि निर्जीव द्वंद्वे आहेत. ह्या द्वैतातून मुक्त होणे...हे अद्वैत आहे आणि हाच अद्वैताचा सिद्धांत आहे.

         सगुण आणि निर्गुण हे सुद्धा एक द्वंद्व असून ते एकत्र संकीर्ण स्वरुपात जेव्हा साक्षात्कार पावते, तेव्हा अद्वैताचा अनुभव येत असतो. मुळात सगुण ह्याचा अर्थच मुळी वस्तुरूपता असा आहे. सगुण हा दृश्य आहे, देह किंवा शरीर आहे. म्हणून त्याला म्हणजे शरीर रुपी आत्म्याला हे जग सगुणात्मक आहे, असे जाणवते. पण जेव्हा मी हा निर्गुणात्मक असतो, अभिव्यक्ती असतो किंवा समष्टी असतो, तेव्हा माझा भवताल, आजूबाजूचे जग निर्गुण आहे, असे वाटू लागते......ही नेणीव आहे.... जगाची जाणीव ही नेणीव, शून्यत्व, किंवा माया वाटू लागते. भवताल नेणीवेत जातो, निराकार होऊन जातो, आणि मी-पणा हा त्यामध्ये विलय पावला तरी ह्या विलयातही माझे साक्षित्व मला जगासह, भवतालासह पाहता येते. भासांतर्गत भास म्हणजे प्रतिभास किंवा भास आणि अभास हे एकमेकांवरील थर किंवा स्थर किंवा पातळी मला दिसू लागतात.....हे साक्षित्व आहे. ह्यालाच निर्गुणाचा साक्षात्कार म्हणतात.

         मी म्हणजे कोण? ह्याचे उत्तर देताना पतंजलीनी म्हणले आहे की हा मी म्हणजे बुद्धी-मन-चित्त आणि अहंकार ह्यांचा जोड complex आहे. ह्यातील अहंकार हा बुद्धी-मन-चित्त ह्यांना लपेटून घेणारा अत्यंत सूक्ष्म असा थर आहे. त्यामुळे अहंकाराचा भेद बुद्धी-मन-चित्त ह्यांच्या सहाय्याने करता येत नाही. त्यासाठी पतंजलींनी पातंजल योगदर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजेच असं की योगसाधनेने अहंकाराचा वेढा दूर करता येतो. ह्यावरून मी चा संबंध भास-आभास ह्या प्रभाव क्षेत्राखाली कसा येतो, हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे, अद्वैत सिद्धांतामध्ये मी चे स्थान आणि प्रभावक्षेत्र किती गुंतागुंतीचे आहे, हे लक्षात येते.

       अद्वैत सिद्धांत हा विषय समजायला अवघड आहे. म्हणून ह्या विषयाचे निरुपण असंख्य संतांनी, विचारवंतांनी आणि तत्वज्ञानी लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून केले आहे. भगवत गीता, गीतेवरील शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या ओशो, जे. कृष्णमुर्ती, अनिरुद्धबापू आदि सद्गुरूंनी भाष्ये लिहिली आहेत, केली आहेत. तरीही ह्या विषयाचा आवाका मोठा आणि आकलन अपूर्ण आहे.

                                                     ***********

 

No comments:

Post a Comment