Saturday, 22 August 2020

हिंदुत्व म्हणजे काय ?

                                                         हिंदुत्व म्हणजे काय ?

                            Why I am a Hindu ? मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आहे, ह्याचा अत्यंत विस्तृत उहापोह शशी थरूर यांनी ह्या इंग्रजी पुस्तकात केला आहे. हा विषय त्यांनी तीन भागात विशद केला आहे. भाग १- हिंदुत्व म्हणजे काय. भाग २- हिंदुत्वाचे राजकारण. भाग ३- आधुनिक परिप्रेक्षातील हिंदुत्व.

                           शशी जी, प्रस्तावनेतच हे स्पष्ट करतात की हिंदुत्व हा रूढार्थाने हिंदू हा धर्म नसून एक महान तत्वज्ञान आहे. म्हणूनच हिंदुत्व हे कुठल्याही एका पवित्र धर्म ग्रंथाचे सूत्र नाही. हिंदू हा जर धर्म म्हणून मान्य करायचा असेल तर ह्या धर्मात देवादिकांचे जेव्हढे महत्व आहे, म्हणजे आस्तिक हे तत्व मान्य केले आहे; तेव्हढेच देवाचे अस्तित्व अमान्यही केले आहे, नास्तिक ह्या संप्रदायामार्फत. हिंदूंमध्ये जैन, बौद्ध, शीख तत्वज्ञान इतके स्पष्ट आणि मान्य केले गेले आहे की ह्या परंपरा म्हणजे हिंदुत्वाच्या उपशाखा मानल्या गेल्या आहेत आणि संविधानाच्या चौकटीत ह्या परंपरा हिंदुत्वातच समाविष्ट मानल्या गेल्या आहेत.

                             आस्तिक हिंदुत्व षडदर्शन संहितेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे; तर नास्तिक हिंदुत्व बौद्ध, जैन, शीख ह्या परंपरांशिवाय चार्वाक आणि मिताक्षर परंपरांतून स्पष्ट होते. वेद-उपनिषदे आणि आरण्यके ह्या ग्रंथांतून आस्तिक परंपरा वर्णन केलेली आहे. महाभारत आणि रामायण हे ग्रंथ धर्म ग्रंथापेक्षा अधिक नीती-अनीती, राजधर्म, कर्तव्य, हिंसा इ अनेक तत्वांचे अवलोकन, चिकित्सा, आणि चिंतन-मनन करणा-या कथा आहेत.

                               केन उपनिषदाने म्हणले आहे की हिंदुत्व ही संकल्पना आणि तत्वज्ञान अशा लोकांना समजावून सांगणे सोपे आहे; ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय, हे मुळातच समजत नाही. म्हणजे असं की जे हिंदू नाहीत, त्यांना हिंदुत्व समजावून देणे, सोपे आहे. पण जे हिंदू असून हिंदुत्व काय हे जाणत नाहीत; त्यांना हिंदुत्व म्हणजे काय, हे समजाविणे, अवघड आहे. 

                             ह्या संदर्भात एक गोड कथा सांगितली जाते. ती अशी - एका तत्वज्ञ ऋषींना परमेश्वर म्हणजे काय, हे समजावून सांगा, असे काही नास्तिक लोक म्हणाले. त्यावर ते काही न बोलता मौन झाले. त्यांच्या शिष्यांनी आणि नास्तिकवादी लोकांनी खूप आग्रह केल्यावर ते म्हणाले, " मौन, शांतता, ध्यानस्थ अवस्था हेच ह्याचे उत्तर आहे. कारण परमेश्वर शांत, निरामय आणि ध्यानस्थ अशी माणसाची खरी अवस्था आहे आणि ह्याच अवस्थेमध्ये ईश्वर, देव, परमेश्वर, आत्मा इत्यादिंचे समग्र ज्ञान संपादन होत असते."

                                                                 *************


                       

No comments:

Post a Comment