Friday, 28 February 2020

अव्यक्त ते व्यक्त

आधी बोलायचे आहे,
पण बोलणार नाही.
देवळाच्या दारामध्ये,
भक्ती तोलणार नाही.
माझ्या अंतरात गंध,
कल्पकुसुमांचा दाटे.
पण पोकळी तयाची,
कधी फुलणार नाही.
नक्षत्रांच्या गावातले,
मला गावातले गुज.
परि अक्षरांचा संग,
त्याला मिळणार नाही.
मेघ जांभळा एकला,
राहे नभाच्या कडेला.
त्याचे रहस्य कोणाला,
कधी कळणार नाही.
दूर बंदरात उभे,
एक गलबत रुपेरी.
त्याचा कोष किना-यास,
कधी लाभणार नाही.
तुझ्या कृपाकटाक्षाने,
झालो वणव्याचा धनी.
त्याच्या निखा-यात कधी,
तुला जाळणार नाही.
-कुसुमाग्रज
-यशवंत देव.
Renuka Khati Purohit, मला जे म्हणायचे आहे, ते पटो वा न पटो. पण श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज ह्या कवितेत, गीतात जे म्हणतात, तेच मला म्हणायचे आहे.
इतुके बोललो आम्ही,
बोलायचे नसूनी.
ज्ञानदेवे बोलिले
तरीही बोलिले वागयज्ञी.
व्यक्त-अव्यक्त, मूर्त-अमूर्त, निर्गुण-सगुण अवघे गोविंदू रे |....असे म्हणणारे संत.....
अस्फुट मनीचे गूज माझे.
स्फुट होतसे तेव्हा.
आम्ही रंगलो,
भक्तीत जेव्हा.
भक्ती हा काव्य रसाचा धनी आहे. माझे शब्दावरील प्रेम, माझे भाषेवरील प्रेम हा माझा भक्तीभाव आहे. ज्ञानदेव-नामदेव-तुकाराम आदी संतांनी अव्यक्त करुणेचा सागर व्यक्त करताना संयत, सम्यक आणि संयमी शब्द रचना करताना मनात आधी खूप आत्यंतिक असे चिंतन-मनन केले आणि "दाटुनी आले मन माझे, शब्दांकित केले सारे |" ....म्हणूनच कुसुमाग्रजांनी म्हणले आहे:
" आधी बोलायचे आहे,
पण बोलणार नाही.
देवळाच्या दारामध्ये,
भक्ती तोलणार नाही."
अस्तु.

No comments:

Post a Comment