Friday, 1 June 2018

नरहर कुरुंदकर -विचार


साहित्य परिषदा व साहित्य संमेलने- नरहर कुरुंदकर विचार
(१)  जन्म- न्या रानडे- १८७८-म फुले व ज्योतिबा निमंत्रित- ज्योतिबा गेले नाहीत. ज्योतिबांचा आक्षेप- सहभागी साहित्यिक वर्ग प्रामाण्यवादी- आजही तीच परिस्थिती- वेगवेगळी संमेलने, परिषदा, बौद्ध, ख्रिश्चन इ ची वेगळी चूल.
(२)   पारंपारिक भारतीय समाज रचना-विषमता आधारित – इंग्रजांनी मात्र सत्ताकाराणासाठी सर्व जाती,धर्म,भाषां संस्कृती इ एकत्र मानले, आणि  राज्यशकट चालविला. साहित्य परिषदांना असा इतिहास नाही. त्यामुळे, साहित्य परिषदांचा कारभार आजही जातीभेद, धर्म इ वर अधिकृत किंवा अनधिकृत चाललेला आहे.
(३)   तरीही स्वातंत्र्या नंतर अनेक बदल घडत आहेत. हे बदल :
(अ)      साहित्य परिषदा परंपरावादी राहिलेल्या नाहीत. काही राहिलेल्या असल्या तरी त्याला साहित्यिक जबाबदार नाहीत. त्याला जबाबदार भोवतालची परिस्थिती होती आणि आहे.
(आ)   साहित्य परिषदांचे उद्देश व कार्य साहित्य संवर्धनाचे, प्रोत्साहनाचे, अभिवृद्धीचे आहे. सामाजिक चळवळ, धर्म-जाती व्यवस्था निर्मुलन किंवा व्यवस्थापन हे त्यांचे कार्य नाही.
(इ)        साहित्य परिषदा सुधारणे हे काम सामाजिक असले तरी ह्या कार्यात असलेल्या साहित्यिकांनीच ते कार्य परिषदेच्या आतून करावयास हरकत नाही. पण त्यामुळे मूळ कार्य आणि उद्देश बाजूला राहता कामा नयेत.
(4) १८५८ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. १८६०-७० ह्या काळात विद्यापीठ अंतर्गत मराठीतून वांग्मय निर्मिती व्हावी, अशी जिद्द दिसते. १८८० नंतर मात्र विद्यापीठात मराठीचे स्थान अवनीत होत गेलेले आहे. पण तरीही मराठी साहित्य निर्मिती व्वृद्धी बहरतच गेली. त्यामुळे लो टिळक आदींच्या जहाल राजकारणा पासून परिषदा वेगळे स्थान टिकवून ठेवू शकल्या. आजही राजकारण फारसे परिषदांमध्ये लुडबुड करताना दिसत नाही. उदघाटना पलीकडे काही फारसे ते करतात असे दिसत नाही !
(५) साहित्य परिषदांनी हाताळलेला दुसरा महत्वाचा प्रश्न शुद्धलेखनाचा आणि भाषा शुद्धीचा. शुद्धलेखनावर खरी जुंपली ती पुरोगामी आणि सनातनी विचारवाद्यांची....त्यातून पारिभाषिक शब्दांची पडलेली भर....आता हे वाद मिटले असून पारिभाषिक शब्दांचा वापर वृत्तपत्रांनी सुटसुटीत केल्याने मराठी भाषा विद्रूप होईल, ही भीती राहीली नाहीयेय. उलट, हे शब्द मराठीचे अभिव्यक्ती सामर्थ्य वाढवीत आहेत.
(६) १९३५ नंतर लोकप्रतिनिधींच्या हातात प्रांतिक आणि १९५२ नंतर राज्यांचा कारभार आला. मुंबईसह महाराष्ट्र ही चळवळ मुख्यत: भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर झाली आणि यशस्वी झाली.
(7) स्वातंत्रोत्तर काळात विद्यापीठातील पदव्या व पद्वुत्तर शिक्षण ह्यातून जो नवीन अध्यापक आणि विद्यार्थी वर्ग निर्माण झाला, त्यांना त्यांची ग्रंथालये व इतर सोयी परिषदांच्या सहभागा शिवाय उपलब्ध झाल्याने त्यांना परिषदांची गरज राहिली नाही. नंतर निर्माण झालेली शासकीय पारितोषिके, पद्मश्री इ बहुमान,अनुदान मंडळे, स्थानिक व दूरदर्शन वाहिन्यांची पारितोषिके इ इ मुळे मराठी साहित्य निर्मिती भरभराठीस इतकी झाली आहे की बहुमान-पारितोषिके इ साठी साहित्य कमी पडू लागले आहे, हे पारितोषिक मिळणा-या साहित्याच्या दर्जा वरून लक्षात येते.
(८) लेखकाच्या मुख्य तीन गरजा असतात- (अ) आपले लिखाण जास्तीत जास्त जनते समोर न्यायचे असते. (ब) त्याला यासाठी प्रकाशकाची गरज असते (क) त्याला आर्थिक फायदा, प्रतिष्ठा, आणि प्रसिद्धी हवी असते. ह्यासाठी तो आर्थिक झीझ ही तो सोसायला तयार असतो. कारण हल्लीचे ९०-९५ टक्के प्रकाशक लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक छापत असतात.
(९) पैसा व प्रसिद्धी प्राप्त करून अनेक लेखक ग्रंथ,लेख, नाटक, कादंबरी, चित्रपट कथा-पटकथा, दूरदर्शन मालिका इ विविध क्षेत्रात निर्मिती करून, शाळा-कॉलेज भाषणे मधील भाषणे, व्याख्यानमाला,इ उपक्रमांद्वारे प्रसिद्ध होत असल्याने परिषदांचे व्यासपीठ फारसे गरजेचे राहिलेले नाही.
(१०) ख-या विचारवंत, प्रतिभावंत लेखकांची अत्यंत महत्वाची गरज असते.....जाणकार,समीक्षक,सुविज्ञ अधिकारी व्यक्तींकडून तपासणी व्हावी, मान्यता प्राप्त साहित्यिकांनी आपल्या लिखाणाचे गुणग्रहण करावे....याची नशा हजार मंडळींनी वाजविलेल्या किंवा वाजवून घेतलेल्या टाळ्यांपेक्षा निराळी-और असते. असा गुणग्राहक वर्ग दिवसेंदिवस मर्यादित होत चालला आहे. ह्या बाबतीत साहित्य परिषदांकडून खूप अपेक्षा आहेत. पण परिषदाही सन्मान प्राप्त, प्रसिद्ध साहित्यिकांचे कार्यक्रम करण्यात, गर्दी जमविण्यात समाधान मानू लागल्या आहेत.
(११) हल्ली अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष निवडणुकी वरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यातील एक “ साहित्यिक कोणाला म्हणायचं “ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या वादाचे प्रथम दर्शनी दिसते, तितके सोपे, साधे व सरळ नाही !कारण भाषा आणि वांगमय हा व्यवहार गुंतागुंतीचा आहे. मतदान म्हणल्यावर त्याची गणिते, आर्थिक उलाढाल, मतांची पळवापळव, मतपेट्या manage करणे इ सर्व व्यवहार-गैर व्यवहार अपरिहार्य होतात. त्यामुळे सभासद कोणाला व कसे निवडून देतात, हे फार मोठे गुपित राहिलेलं नाहीयेय.
(१२) शेवटचा व महत्वाचा मुद्दा हा की साहित्य परिषदे सारख्या संघटना साहित्यावर प्रेम करणा-यासाठी आहेत की साहित्यिकांसाठी आहेत? जर साहित्यावर प्रेम करणा-याच्या असतील तर परिषदांमध्ये विद्वान मान्यतेपेक्षा लोकमान्यता मान्य केली पाहिजे. लोकानुरंजन झाले पाहिजे, मतदान झाले पाहिजे.इ.इ. पण लोकमान्यता ही मोठी निर्दोष बाब आहे, असे नाही. त्याचप्रमाणे, प्रतिभावंत साहित्यिक सुद्धा मत्सरग्रस्त, मान, मानधन,आग्रह आणि पाहुणचार ह्यामध्ये अडकलेले नसतात, असे नाही.
(१३) थोडक्यात, गेली ६०-७० वर्षे परिषदांचा कारभार ज्या पद्धतीने चालतो, त्या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. त्यांना आपला कायापालट करताना वान्गमयीन व्यवहारात आपल्या संघटनेचे स्थान काय असावे, हे निश्चित केले पाहिजे. परंपरागत दृष्टी आणि दृष्टीकोन सोडून त्यांनी हे निश्चितपणे जाणून घेतले पाहिजे की साहित्य परिषदा स्पर्धक नसतात. त्या उपकारक असतात. तसेच, कलेसाठी कलावाद किंवा जीवनसाठी कला अशा लढाया करून परिषदा चालविता येणार नाहीत. परिषदांची मुखपत्रे व त्यांची संपादक मंडळे ह्यांनी मुखपत्र हे साहित्य सेवेसाठी आहे, हे सूत्र बांधून घेतले पाहिजे आणि लोकप्रियता ह्या निकषा पासून दूर राहिले पाहिजे.
(१४) निरनिराळे साहित्य प्रकार अभ्यासू वृत्तीने परिषदांनी हाताळले पाहिजेत. उदा. शोकांतिका, कॉमेडी ह्या किंवा इतर वांगमय प्रकारांची सखोल अभ्यासने चालविली पाहिजेत. प्राचीन वान्गमयातील श्रेष्ठ साहित्यमूल्यांचा अभ्यास अजूनही मर्यादित आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या नियोजनात परिषदा भरीव कार्य करू शकतात.
(१५) सारांश रूपाने असे म्हणता येते की सर्वसंग्राहक असणे आणि सर्व इष्ट बाबींना उपकारक होणे, या दोन पद्धतींच्या आधारेच परिषदांची नवी मांडणी होऊ शकेल.
                     **************    

Monday, 7 May 2018

नैराश्य Depression

Depression हा शब्द नसून एक संज्ञा आहे. इथे आपण मराठीत चर्चा करताना depression चा विचार वैद्यकीय दृष्टीकोनातून, एक रोग किंवा रुग्णावस्था ह्या संदर्भात करणार आहोत.
          मी स्वत: ह्या अवस्थेमधून गेलेलो असल्यामुळे व माझा चिकित्सक स्वभाव असल्याने मी ह्या अवस्थेवर खूप वाचन केले, माझ्या अवस्थेबद्दल त्यावरून चिंतन केले व नंतर अनेकदा लेखन करताना मनन केले आहे.
            प्रथम आपण हे समजावून घेऊ की ह्या अवस्थेचे अनेक पैलू किंवा अंगे आहेत. नैराश्य हे मुख्य अंग आहे तर विषण्णता, खिन्नता, औदासिन्य किंवा उदासीनता ही ह्याच अवस्थेची इतर अंगे आहेत.
           निराशा ह्या शब्दांगापासून नैराश्य हे अर्थांग तयार झाले आहे. निराशा अनेक कारणांमुळे येत असते किंबहुना आयुष्य हा आशा-निराशा ह्यांचा खेळ असतो. हे सर्व अतिशय सामान्य आहे, कारण आशा-निराशा ह्या तत्कालीन, निश्चित कारणोद्भव असतात आणि ह्या अवस्था नसतात. सामान्य माणसाच्या ह्या भाव-भावना असतात. आशा-निराशा ह्या जगणे ह्या अवस्थेचे संवेदनात्मक, सजीव आणि संजीवन असे परिमाण आहे. ह्या अर्थाने विषण्णता विषय (objective) संबंधित आहे. खिन्नता खेद म्हणजे दुख:, वाईट वाटणे, ह्या भावना (Emotional) संबंधित आहे. तर उदासीनता तटस्थ, अलिप्त, संवेदनाक्षम पण अंतर राखून असणे ह्या ऐहिक व वैयक्तिक (subjective) बाबी आहेत. पण ह्या सर्वांच्या मुळाशी निराशा ही सर्वसामान्य अभिव्यक्ती आहे आणि तिचा परिप्रेक्ष निरनिराळ्या पातळ्यांवर अभिव्यक्त होत असतो.
 ह्या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत-
 (१) नैसर्गिक नैराश्य ( Natural depression)-काही काळापुरते म्हणजे ४८ तासांपेक्षा कमी काळ टिकणारे असते.
(2) तपासणी सिद्ध नैराश्य (Clinical depression)- नैसर्गिक नैराश्य ४८ तासांपेक्षा जास्त व सातत्याने जाणवत राहते. ह्या अवस्थेमध्ये भीती, एक प्रकारचे गूढ भय -भूतकाळातील किंवा भविष्यातील - जाणवत राहते. हे भय निराकार म्हणजे abstract स्वरूपाचे असते. जे भय किंवा भीती सामान्य माणसाला जाणवत नाही, पण रुग्णावस्थेतील माणसाला जाणवत राहते. कित्येकदा रुग्णाला भयग्रस्त किंवा भीतीग्रस्त करणारे कारण अत्यंत साधे, सामान्य व्यवहारातले असते. पण त्या भयाची अकारण तीव्रता रुग्ण व्यक्तीलाच ग्रासून टाकते. त्यामुळे सदर व्यक्ती स्वत;ला असुरक्षित (Insecure) मानते व आपले शरीर,मन आणि कार्यक्षमता गमावून बसते. ही मनोरुग्णावस्था clinical intervention म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी अत्यावश्यक असते.
(३) नैराश्यग्रस्त हालचाली/ व्यवहार (Depressive disorders)- काही रुग्णांमध्ये सतत विशिष्ट प्रकारच्या हालचाली, हावभाव किंवा व्यवहार करण्याच्या पद्धती स्पष्टपणे किंवा ठळकपणे दिसून येतात. असे रुग्ण वेडाच्या पातळीवर केव्हाही, कधीही जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दखल करणे, त्य रुग्णासह सर्वांच्या हिताचे असते.
                   नैराश्य म्हणजे नक्की  काय ह्याचे विस्तृत उत्तर मानसशास्त्राच्या ग्रंथांत उपलब्ध आहे. तसेच वर दिलेल्या विवेचनावरून हे स्पष्ट होते की नैराश्य ही एक अवस्था असून त्यामुळे सदर व्यक्ती सर्वच बाबतीत नकारात्मक होते. तिच्या भावना, कृतीजन्य हालचाली आणि विचार असमाधानपूर्ण असतात. ही व्यक्ती न्यूनगंडग्रस्त , भयगंडग्रस्त आणि अस्वस्थ असते. तरीही काही जणाची बौद्धिक, वैचारिक आणि व्यवहारिक पातळी सामान्य दिसते किंवा भासते. कारण ही रुग्णावस्था प्राथमिक स्वरुपात असते. पण ह्या प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार (clinical treatment) व उपचार पद्धती (counselling / therapy) अनुसरली गेली नाही, तर ही अवस्था विकोपाला जाऊन रुग्ण वेडा (insane) किंवा वेडसर ( distressed sanity) होऊ शकतो.
              नैराश्याची लक्षणे -
(१) भूक मंदावणे (2) वजन कमी होणे किंवा वाढणे.(३) खूप झोप येणे किंवा न येणे (४) अशक्तपणा आणि दुर्बलता (Loss of energy or increased fatigue-ness).(5) आयुष्य किंवा जगणे निरर्थक, बेचव वाटणे.(६) अकारण अपराधीपण (7) विचार करणे, एकाग्रतेने ऐकणे,आणि निर्णय घेणे, ह्यामध्ये अडथळा येणे, सुसंगती न लागणे. (८) आत्महत्या किंवा मृत्यूबद्दल सारखा विचार करणे.
         ह्यातील एक किंवा अधिक लक्षणे 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहणे किंवा दिसत असतील तर नैराश्य ह्या रोगाची किंवा व्याधीची सुरुवात झालेली आहे, असे मानता येते. मात्र आणि अर्थात, मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरचे मत हे अधिकृत असते व तेच अंतिम समजायचे असते.
         ह्याशिवाय, काही इतर वैद्यकीय कारणे उदा. थायरोईड, मेंदूतील गाठ, आणि व्हीटामिन्सची कमतरता ही करणे सुद्धा नैराश्य सूचक लक्षणे दर्शवित असतात. ती नाहीत ना,ह्याची खात्री करून घ्यावी लागते.तसेच, हे लक्षात घेतले पाहिजे की एका पाहणीनुसार, १६% लोक नैराश्याचे रुग्ण आहेत आणि ३३% स्त्रीयांना ह्या रोगाची बाधा झालेली आहे.
                 दुख:असणं किंवा असमाधानी असणं म्हणजे नैराश्य नव्हे. तसेच, अकस्मात घडलेल्या धक्क्यामुळे (trauma) झालेला आघात आणि त्यामुळे आलेले नैराश्य हा रोग नाही.
                नैराश्य हा विकार जडण्याची काही शास्त्रीय कारणे-
(1) मेंदूतील काही विशिष्ट जीव-रासायनिक द्रव्ये किंवा थायरोईड ग्रंथीतील थायरोकझिन हा स्त्राव  अधिक प्रमाणात स्त्रवण होणे.
(2)अनुवांशिकता- काही विशिष्ट प्रकारच्या जनुकांमध्ये विपरीत बदल घडणे. ही जनुके मेंदूचे कार्य नियंत्रित करीत असतात.
(३) काही व्यक्तींचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व नकारात्मक, सतत काळजी करणारा, मनाविरुद्ध घडणा-या गोष्टींमुळे अस्वस्थ होऊन ताणतणाव सहन करणारा किंवा परिस्थिती आणि सभोवताल ह्या बद्दल खूप चिंतीत असणारा स्वभाव.
(४) सातत्याने सभोवताली घडणारे अन्याय, अत्याचार, असमाधानकारक गोष्टी ह्यामुळे स्वत:ची प्रतिमा सांभाळू न शकणारा स्वभाव.
                            ह्या वरील कारणांवरून असे दिसते की नैराश्य ही अवस्था भौतिक कारणांपेक्षा मानसिक कारणांमुळे जास्त संभाव्य असते. त्याप्रमाणे, पुढील उपचार करता येतात-
(१) थायरोईड ह्या ग्रंथीच्या अयोग्य कार्यामुळे नैराश्य येऊ शकते, म्हणून ह्या ग्रंथीची Radio isotopic उपकरणे वापरून काटेकोर तपासणी करणे, आवश्यक आहे.
(2) ह्याखेरीज, रुग्णाची सांस्कृतिक आणि कौटुंबिक जडणघडण तपासली पाहिजे. ह्या कारणांची मीमांसा तज्ञ मानस शास्त्रज्ञाने करणे, आवश्यक आहे.
(३) मेंदूच्या सुलभ कार्य करण्यासाठी antidepressant drugs तज्ञ डॉक्टर वापरतात.
(४) Cognitive Behavioural Therapy (CBT) ही उपचार पद्धती काही तज्ञ वापरतात.त्यामुळे वागणूक, वर्तणूक, विचार पद्धती मध्ये काही चांगले बदल होऊ शकतात.

(५) नैराश्याचा खूप त्रास म्हणजे हालचाली, तोल सांभाळणे इ वर होत असेल तर Electroconvulsive Therapy (ECT) is a medical treatment most commonly used for patients with severe major depression or bipolar disorder who have not responded to other treatments. It involves a brief electrical stimulation of the brain while the patient is under anesthesia. A patient typically receives ECT two to three times a week for a total of six to 12 treatments. ECT has been used since the 1940s, and many years of research have led to major improvements. It is usually managed by a team of trained medical professionals including a psychiatrist, an anesthesiologist and a nurse or physician assistant.

(6) For many people, regular exercise helps create positive feeling and improve mood. Getting enough quality sleep on a regular basis, eating a healthy diet and avoiding alcohol (a depressant) can also help reduce symptoms of depression.

             शेवटच्या दोन उपायांचे भाषांतर टाळले आहे. कारण अनेक वैद्यकीय शब्द आहेत, जे पारिभाषिक असल्याने भाषांतर बोजड होईल. 
             ओशोंच्या मते " नैराश्य म्हणजे तुमच्यात कसला तरी राग, क्रोध नकारात्मक स्थितीत दडून बसला आहे." त्यांच्या मते नैराश्य म्हणजे क्रोध, राग. खरी समस्या क्रोध आणि उपाय योजना नैराश्यावर....हे म्हणजे सावल्यांशी लढल्यासारखे झाले ! "
               आता माझा अनुभव. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्या आपल्या मुलभूत जगण्याच्या प्रेरणांना उखडून टाकतात. नुसता आदर्शवाद नव्हे तर जीवनाची मुलभूत चाकोरीच उध्वस्त करतात. प्रामाणिकपणा ही माझी नुसती श्रद्धा नाहीतर जगण्याचे एक सूत्र आहे. उदा. प्रामाणिकपणा व सत्य निष्ठा. ह्या माझ्या गेल्या ६७ वर्षे जपलेल्या नैतिक आधारभूत जीवनेच्छा आहेत. ज्यावेळी वास्तवात ह्या निष्ठा असून ही माझ्यावर गुन्हेगारीचे आरोप ठेवून माझ्यावर खोटी, अप्रामाणिक आणि भ्रष्टचारयुक्त कारवाई झाली, तेव्हा मला जबदस्त धक्का बसलो. पण त्यावेळी माझ्या अंगभूत मानसिक शक्तीच्या जोरावर मी सर्व सहन केले. कालांतराने मात्र हा मनाच्या तळाशी गेलेला धक्का अचानक उसळी मारून, ज्व्लामुखीसारखा उद्रेक पावला. त्यामुळे मी कामावर असताना माझी बुद्धी, कार्यक्षमता अवगुंठीत होऊन जाऊ लागली. मी एकदम blank, शून्य होऊ लागलो. काहीच आठवत नाही, सुचत नाही, हातपाय गळून गेले आहेत....अशी अवस्था होऊन जायची. मग मी कामावरून घरी परत येत असे आणि सतत झोपून जात असे. अर्धवट जागेपण अनेकदा जाणवत असे आणि पूर्वी घडून गेलेल्या घटनांची काल्पनिक भीती स्वप्नवत माझ्या मनांत घिरट्या घालू लागत असे.
           मनोविकार तज्ञांच्या सल्याप्रमाणे औधधे घेतल्यावर थोडे बरे वाटल्यावर कामावर जाऊ लागलो. पण तिथेच पुन्हा असे नैराश्याचे झटके येऊ लागत. मी पुन्हा घरी व औषध पाणी....असे एकून तीन वेळा attacks आले...मग मात्र सलग जवळ जवळ ६ महिने मी मनोविकार तज्ञ डॉक्टरांकडून औषध व्यवस्था आणि counselling घेतले. तेव्हा पूर्ण बरा झालो.
          ह्या माझ्या अवस्थेचे त्यावेळी नाही पण नंतर मी विश्लेषण केले तेव्हा माझ्या लक्षात आले की एखादी घटना घडून जाते. तिला आपण धैर्याने तोंड देतो. पण कालांतराने ज्यावेळी  मन:स्थिती आणि शारीरिक आजार वगैरे मुळे आपल्याला दुर्बलता आलेली असते, तेव्हा जुन्या धक्का देऊन गेलेल्या घटनांमुळे मनाला झालेल्या जखमा, ओरखडे भरून येतात. पण आपले नैसर्गिक बळ जेव्हा इतर मूळ घटनेशी संबंधित नसलेल्या घटना, मानसिक व शारीरिक दुर्बलता ह्यामुळे अशक्त होते, तेव्हा ह्या भूतकाळात गाडलेल्या घटनांचे मानसिक आघात उचल घेतात व नैराश्याचे झटके येऊ लागतात.
                  म्हणून वेळीच मनोविकार तज्ञ डॉक्टरांकडून उपाय योजना केल्या पाहिजेत व counselling करून घेतले पाहिजे. 
                                            ***************
 




                   
               
            

Tuesday, 24 April 2018

मांडुक्य उपनिषद सार-१

मांडुक्य उपनिषद आत्मा म्हणजे काय, ह्याचे निवेदन करताना म्हणते,

                            एकात्मप्रत्ययसारं, प्रपंचोपशमं, शान्तं, शिवं, अद्वैतं |
                            चतुर्थं मन्यन्ते | स आत्मा | स विज्ञेय: ||7 ||
आत्मा कसा आहे तर तो -
(१)  एकात्मप्रत्ययसारं- एकात्मता म्हणजे सर्वत्र एकच भाव, एकच अवस्था आणि एकच गती. आत्मा एकात्म आहे म्हणजेच आत्मतत्व आहे. चराचरात हे आत्मतत्व सामावलेलं आहे. ह्याची जाणींव जेव्हा जीवाला, आपल्याला होते, तेव्हा एकात्म तत्वाचे सार अंतर्मनात उतरते. ह्यालाच ' एकात्मप्रत्ययसार ' म्हणतात.
(2) प्रपंचोपशमं - आत्मा प्रपंचाचा उपशम करतो. प्रपंच म्हणजे जगण्याची धडपड. ह्यात सर्व आले, खाण्याची धडपड, पिण्याची धडपड, सुख मिळविण्याची धडपड, प्रजोत्पत्तीची ( लिंग वासना ) धडपड इ इ.
जग म्हणजे  ' ज ' जन्म आणि ' ग ' म्हणजे गमन = मृत्यू. जन्मापासून मृत्यू पर्यंत जे अस्तित्व रूपाने आपल्या जाणीवेत असते, ते म्हणजे जग. ह्या जाणीव म्हणजे जगण्याची सगळी धडपड आहे. ही जगण्याची धडपड म्हणजे जगण्याची प्रापंचिक अवस्था भ्रामक आहे म्हणून ह्या अवस्थेचा जो अंत म्हणजे उपशम करतो, ती म्हणजे आत्मा होय.
(३) शान्तं- आत्म्याला राग, लोभ, मद, मत्सर इ षड्रिपू, वासना, नसतात.म्हणून तो शांत असतो.
(४) शिवं- शिव म्हणजे कल्याणकारी...आनंददायी. शिव हा आत्म्याचा मनुष्य अवतार म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. पण मूलतः तोच आत्मा होय.
(५) अद्वैतं - आत्मा निरंतर, संजीवन, निराकार, निर्गुण असून चैतन्यमय आहे. तो अद्वितीय आहे. त्याला दुसरेपण नाही. म्हणजे तो एकमेव, द्वंद्वरहित, द्वंद्वशून्य असा आहे.
                                    आत्मा हे विज्ञान आहे म्हणून त्याला विज्ञेय म्हणाले आहे. आत्मा समजून घेण्यासाठी मांडुक्य ऋषींनी चार भागात निवेंदन केले आहे. पहिल्या भाग - वैश्वानर, दुसरा- तैजस, तिसरा- प्राज्ञ. हे तिन्ही भाग बौद्धिक पातळीवर समजून घेता येतात. पण चौथा भाग मात्र मानून घ्यावा लागतो. कारण हा भाग सर्वस्वी स्वानुभावाचा आहे. अनुभव शिवाय प्रचिती येत नाही आणि प्रचीती शिवाय सिद्धता नाही. म्हणून मांडुक्य म्हणतात, " चतुर्थं मन्यन्ते " चौथा भाग गृहीतक असल्या प्रमाणे मान्य करावा लागतो.
                                                ***************

Saturday, 25 November 2017

कर्तव्य

कर्तव्य ही भावना नसून तत्व आहे. ह्या तत्त्वातूनच भगवत गीतेचे तत्वज्ञान उदय पावले आहे. अर्जुनाच्या विषाद योगापासून भगवंतांनी हे तत्व सांगण्यास सुरवात करून ह्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती संन्यास मोक्ष इथपर्यंत कशी विस्तृत आहे, हे स्पष्ट केले आहे.
                  कर्तव्य हे वास्तवतेचे नाही, तर अस्तित्वाचे तत्वज्ञान आहे. तत्व म्हणल्यावर ते कठोर असतं....आणि ते सर्वकालीन, सर्वव्याप्त आणि अखिल मानवी जीवनाला कल्याणकारी कसं असतं, हे सांगताना भगवंतांनी १८ अध्याय खर्ची घातले आहेत. कर्तव्य म्हणजे जबाबदारी आहे,आणि ती प्रेयस म्हणजे प्रीय नसली तरी श्रेयस म्हणजे मानवतेचे कल्याण साधणारी, माणसाच्या कर्तृत्वाला आव्हान देणारी धाडसी आणि पराकोटीचे व्यापकत्व असणारी जगण्याची नव्हे तर जीवन साकारण्याची तत्व धारणा, तत्वशीलता आहे.
                 ह्यादृष्टीने कर्तव्य परायण असणे. हा सद्सद्विवेक आहे. परिस्थिती म्हणजे भवताल, अवकाश, आणि कालसापेक्ष चिंतन आहे. ते व्यष्टीनिष्ठ नसून समष्टी धारक अनुबंधन विचारवंतांच आहे. अर्जुन हा नुसता योद्धा नाहीयेय, तो विचारवंत आहे, म्हणून त्याच्या पुढे कर्तव्य पालन करताना आपलेपणा, मी-माझे आणि माझी नाती तसेच अहिंसा आणि मानव धर्म ह्या अतिशय मनस्वी आणि गूढ समस्या उभ्या राहिल्या आहेत.
                  सामान्य माणसा पुढे उभे राहाणा-या मुलभूत समस्या अर्जुनापेक्षा फार वेगळ्या नसतात. त्यामुळे श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रमाणभूत मानून व धरून गीतेचा प्रपंच मांडला आहे. अर्जुन हा निमित्त मात्र आहे. त्याने विचारलेल्या शंका आणि प्रश्न हे इतके सामान्य कोटीतील आहेत की कृष्णाने त्याची संभावना  काही ठिकाणी        " मूढ, मूर्ख " अशी केली आहे ! कर्तव्य हे मानवता वादाचे एक सूत्र आहे, असे स्पष्ट करताना कृष्णाने अनेक दर्शन शास्त्रांचा आधार घेतला आहे. उदा. सांख्य योग, कर्म योग, ज्ञान योग इ दर्शन शास्त्रे काय सांगतात, हे विषद केले आहे. प्रकृती आणि विकृती, स्त्री-पुरुष, नीती-अनीती, धर्म-अधर्म, इ अनेक द्वंद्वांची उकल केली आहे. त्याचप्रमाणे, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि मानवी भाव-भावना इ सूत्रांचे विवेचन केले आहे. उदा. १४ व्या गुणत्रय विभाग योग मध्ये त्याने मानवी प्रकृतीची त्रिगुणात्मक विभागणी आणि अवस्था स्पष्ट करताना म्हणाले आहे की गुणातीत अवस्था ही श्रेयस आहे, असे म्हणाले आहे.
                                           मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयो:|
                                           सर्वारंभपरित्यागी गुणातीत: स उच्यते || १४.२५ ||
                कर्तव्य पालन करताना तू गुणातीत हो, कारण कर्तव्य हे मानवी जीवनाचे संविधान आहे, मानवी कर्तृत्वाची घटनात्मक चौकट आहे......संस्कृतीचे अभिवादन आहे. संस्कृतीचे सृजन आणि संवर्धन ज्या प्रक्रियेतून होते, तिचे समाधान कर्तव्य पालनात आहे. संस्कृती तुझ्या-माझ्या कर्माने नष्ट होणार नसून तिचे केवळ संवर्धन करणे, हे कर्तृत्ववान समष्टीचे कार्य आहे. ज्यावेळी कर्तव्य पालन करावयाचे असते, तेव्हा अर्जुना, तू व्यष्टी नाहीस समष्टी आहेस..... संस्कृतीचे अखंडत्व टिकविणे, हे तुझ्या जीवनाचे प्रत्यक्षदर्शी कार्य आहे.कारण संस्कृतीचा लय आणि विलय हे निसर्गाचे कार्य आहे, तू त्याची चिंता करू नकोस.....
                                                              ***********

             

Saturday, 21 October 2017

मैत्री, नाते आणि विवाह

शेक्सपियर म्हणतो, " जग ही एक रंगभूमी आहे "....आजच्या लोकसत्तेच्या लोकरंग मध्ये नसिरुद्धीन शहाच्या  मुलाखतीचा वृत्तांत आला आहे. त्यामध्ये नसिरुद्धीनने अनेक समाजिक गैरसमजांचा धांडोळा घेतला आहे. तो मार्मिक आहेच, साक्षेपी आहेच, पण त्यापेक्षा तो अत्यंत मुक्त असा संवाद आहे.
                      जग हे आपले जगण्याचे ठिकाण आहे, धर्मशाळा नाही. आपल्या जन्मापासून आपण आपली ह्या जगामध्ये काय भूमिका आहे, हे नकळत शिकत जात असतो. बालपणी, मी कोण, ही ओळख, आपल्याला परिचय करून देते, वात्सल्य म्हणजे काय...ह्याची. कुटुंबातून कळत जात...ह्या जगाच्या पाठीवर माझी माणसे कोण आहेत आणि कोण नाहीत....इथेच आपल्या आवडी-निवडी घडू लागतात. हळू-हळू शाळा-महाविद्यालयातून आपलं जग विस्तारित होऊन घराच्या बाहेर आपली नवीन नाती घडू लागतात. त्यातून मित्रत्व हे नात आकार घेऊ लागत. पण ह्या नात्याचे संदर्भ आणि ह्या नात्याच्या क्षमता जाणून घेण्याचे वय त्यावेळी आपल्याला नसते....ह्याचे भान येण्यासाठी आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आपल्या जगण्यापेक्षा, आपल्या जीवनातील नेमके काय स्थान आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्या आवडी-निवडी तपासून घेण्याची नितांत गरज ह्याच वयात असते. आपल्या जीवनातील नात्यांचे अग्रक्रम ह्याच काळात आपल्याला समजून घेण्याची अत्यावश्यकता असते. अशा वेळी शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, आपली वाचन संस्कृती आणि घराचे आपल्या नकळत आपल्यावर घडणारे संस्कार फार महत्वाचे असतात. हेच नेमके ह्या वेळी कमी पडले, तर आपल्या सह आपल्या कुटुंबाचे घडणारे नाते... ह्या समस्या बनू शकतात, नव्हे आजच्या काळात ह्या समस्या फार मोठ्ठ्या प्रमाणात गंभीर होऊ लागल्या आहेत....हे माझे आकलन नसून हे ह्या पिढीचे समाजभान आहे.....जे मला अस्वस्थ करीत आहे.
                    प्रत्येक व्यक्तीच्या जगाच्या रंगभूमीवर विवाह हे एक स्थित्यंतर असते, मन्वंतर असते. आपल्याला लाभणारा जोडीदार हा सहजीवन प्रवासी म्हणून आपण त्याला स्वीकारायचे असते. हे विसरून आपण आपले अहंकार, आपली अस्मिता, माझ्या पदव्या, माझे शिक्षण, माझी आर्थिक-सामाजिक प्रतिष्ठा....ही सर्व माझे\पणाची वस्त्रे,अलंकार,आणि प्रतिमा आहेत...हे न ओळखल्यामुळे आपण आपल्यातील एक कुटुंब-पुरुष-स्त्री ही संवेदनाच समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. जग ही रंगभूमी आहे तर ह्या रंगभूमीवर माझी कुटुंब-पुरुष-स्त्री म्हणून माझी ओळख मी करून घेण्यासाठी कमालीचे धैर्य, कमालीचे मानसिक आणि बौद्धिक श्रम-कष्ट घेतले पाहिजेत.....मुख्य म्हणजे माझी मानसिकता, बौद्धिक क्षमता आणि माझी स्वत:ची भूमिका नेमकी ह्या संदर्भात काय आहे, हे समजून घेणे, ही आपली सत्व कसोटी आहे, हे समजून घेण्यास आपण इथे कमी पडलो, अपयशी झालो, म्हणजे घटस्फोट घेणे भाग पडत असेल, तर पुढील जीवन प्रवास, जगाच्या रंगभूमीवरील आपली पावले अवरुद्ध होणार आहेत, अडखळणार आहेत...आणि ह्यातून आपण स्वत:ला सावरून पुन्हा नव्या दमाने उभे राहण्याची क्षमता आपली आहे की नाही? आपण जीवनाच्या दीर्घकाल पटाचा विचार करीत आहोत की नाही?.......ह्यामध्ये आपल्या उमेदीचा काळ खर्ची पडणार आहे.....ह्याचा सम्यक, सकारात्मक आणि स्पष्ट विचार करण्याची आपली क्षमता आहे का? आणि असेल तरीसुद्धा हे सक्तीने करणे, ही काळाची आणि आपल्या जीवनाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अनिर्वाय, पर्याय नसलेली घटना, परिस्थिती आहे का? आणि ह्याचा निर्णय आपण एकट्याने घेणे बरोबर आहे का? ज्या निर्णयामुळे आपल्या विवाहाची केवळ समस्याच  नाही तर संपूर्ण विवाह संस्थेच्या योग्यायोग्यतेवर आपण एक भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे करीत आहोत, ह्याचे भान आपण ठेवत आहोत का? जगाच्या रंगभूमीवरील आपला हा प्रयोग यशस्वी होणार आहे का ?
                     हे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजे, तरच जगाच्या रंगभूमीवरील आपल्या भूमिकेला आपण न्याय दिला असणार आहे किंवा देणार आहोत, असे मला वाटते.
                                          **************

Friday, 20 October 2017

ब्रम्हचर्य.. पातंजल योग दर्शन

पतंजलींनी चौथा यम 'ब्रम्हचर्य ' म्हणजे काय हे सांगताना म्हणले आहे, " ब्रम्हणि चरति इति ब्रम्हचारी ".जो ब्रम्हपदात स्थित असतो, तिथे राहून, जो सर्वत्र वावरतो, किंवा ज्याला जीवनाच्या परम अद्वैत तत्वाचे अखंड भान असते, जीवनाच्या एकमेवाद्वितीय सत्तेच्या जाणीवेत जगतो....तो ब्रम्हचारी होय. अद्वैत हीच जीवनाची सत्यता आहे. आपण द्वैताचे प्रामाण्य स्वीकारतो आणि ' मी-तू-तो ' इत्यादी तुकड्यांत जगतो. त्यामुळे आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण होत असतात.
             ब्रम्हचर्य ह्या संज्ञेत चर्या म्हणजे चालणे,हालचाल करणे,वागणे-बोलणे इ क्रिया येतात. जगण्याच्या क्रियेचे हे अनिवार्य भाग आहेत. तर ब्रम्हन म्हणजे अरूप-निर्गुण आणि रूप-सगुण ह्या अस्तित्वाच्या जाणीवांचे अखंड चिन्तन-मनन होय. थोडक्यात, जगणे ह्या वास्तविकतेचे आपल्या अस्तित्वाच्या परिप्रेक्षात भान ठेवून आचरण करणे.
              ब्रम्हचर्य म्हणजे लैंगिक किंवा संभोग क्रिया न करणे, हा रुढार्थ अतिशय उथळ आहे. वैवाहिक जीवन म्हणजे अब्रम्हचर्य नव्हे. वैवाहिक जीवनात संभोग हे प्रेमाचे आविष्करण आहे. प्रेम हे कौटुंबिक-सामाजिक पातळीवर वेगवेगळ्या नात्यांनी व्यक्त होत असते, प्रगट होत असते. आई-वडील व आपण ह्यांतील प्रेमाच्या नात्याला वात्सल्य म्हणतात, बहिण-भाऊ ह्याच्यातील प्रेमाच्या नात्याला स्नेह म्हणतात, मैत्रीतील प्रेमाच्या नात्याला मित्रत्व म्हणतात, इत्यादी नाती म्हणजे प्रेमाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारे आपल्या अस्तित्वाचे भान आहेत.
             विमला ठकार म्हणतात, " Bramhacharya is a triple dedication to Perception, understanding and awareness.....It is not a code of conduct. These are Absolute values of human life because these values cannot be bargained away or compromised.....Without these values, it seems to me that sane & healthy societies can not come into existence."
                      **************

Thursday, 19 October 2017

श्रद्धा आणि संस्कार



श्रद्धा ह्या घडविल्या जातात, तर संस्कार हे घडत असतात. श्रद्धा हे भूतकाळाचे, स्मृतींचे, आणि भवतालाचे माझ्यावर झालेले परिणाम असतात. माझी कुटुंब संस्था हा माझ्यावर होणारा आणि होत जात असलेला पहिला आयाम असतो. माझे आई-वडील आणि त्यांच्यापासून उद्भवलेली नाती....ह्यांच्या निरीक्षणातून माझ्या बुद्धीवर आणि मनावर जे परिणाम होत असतात, त्यामुळे मला जे आकलन होत असते, ते म्हणजे संस्कार होत.पण माझ्या श्रद्धा म्हणजे belief systems मात्र माझ्या कुटुंबा नंतर समाज, शाळा-महाविद्यालये, माझी नोकरी-व्यवसाय क्षेत्रे...ह्यातून मी माझी मते,माझे ज्ञान आणि माझे प्रगटीकरण घडविले जात असते. माझे यशापयशाचे धडे मी शिकत असतो. ह्यातून मला जे अनुभव येत असतात, त्यामुळे माझ्या श्रद्धा घडविल्या जात असतात. जसजसे वय वाढत जाते, आणि माझ्या यशापयशाचे अनुभव....जे मला बाहेरून म्हणजे समाजाकडून, कुटुंबाकडून,देशाच्या परिस्थितीतून येत असतात, त्यातून माझ्या श्रद्धा विकसित होतात.
                    संस्कार हे घडत असतात, ह्याचा अर्थ असा की माझ्या श्रद्धा जसजशा बाहेरून विकसित केल्या जातात. तसं तसे माझे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्यांचे नकळत एक साकल्य, एक प्रकारचे सामंजस्य घडत असते आणि त्यातून मानसिक जडणघडण होत जाते....ही जडणघडण नकळत होत असते...म्हणून ह्याला संस्कार म्हणतात.....कारण संस्कार ही एक घडत जाणारी अंतर्गत प्रक्रिया आहे. तर श्रद्धा ही बाह्य प्रक्रिया आहे. श्रद्धा ही inputs आहेत, तर संस्कार ही internal processing units आहेत आणि माझे वागणे हे output आहे.
                  अध्यात्माच्या परिभाषेत श्रद्धा हे जगणे आहे, तर संस्कार हे जीवन आहे. मी कोण आहे....  हा मानवाचा अखंड शोध आहे. ह्या शोध मानवी उत्क्रांतीचा जनक आहे. मानवतेचा भौतिक विकास हे एक परिमाण आहे, पण ह्या परिमाणाच्या पलीकडे....मी कोण आहे, ही जाणीव निरंतर, शाश्वत आणि अस्वस्थ करणारी आहे. सुख-दु:ख आणि यश-अपयश ह्या जगण्याच्या प्रेरणा आहेत. त्यामुळे ज्ञान संवर्धित होण्या ऐवजी संपत्ती धारणा क्षमता आणि आर्थिक सुरक्षितता ह्यांना अतोनात महत्व आले आहे. ह्यातून व्यक्तिविकास साधला जात नसून जगण्याच्या क्षमता वाढत आहेत, पण जीवन विकासाच्या प्रेरणा अवरुद्ध होत आहेत.....हे अध्यात्मिक भाषेतील अज्ञान आहे. म्हणून असं म्हणतात की शिक्षण आणि संपत्ती विकासातून जगण्याची परिमाणे, मानवाचा भौतिक विकास झाला  आहे, पण जीवनाचे आकलन मात्र अवगुंठीत झाले आहे. थोडक्यात, माणसाचा विकास असंतुलित झाला आहे...जगणे आणि जीवन ह्यांतील दरी ....गरीब आणि श्रीमंत ह्यांच्यातील दरी प्रमाणे ...वाढत चालली आहे.
                 ह्यामुळे अध्यात्म म्हणते की सुखाची साधने,सुख मिळविण्याच्या संधी आणि क्षमता विकास पावल्या असल्या तरी माणूस असमाधानी, अशांत आणि अस्वस्थ झाला आहे...पूर्वीपेक्षा जास्तच, कारण मी कोण आहे हा शोध माझे काय आहे...ह्या मध्ये गुरफटून गेला आहे. माझेपण मी च्या बाह्य क्षेत्रात, परिप्रेक्षात आणि भौतिक परिमाणांत हरवून आपण..... मी कोण हा शोध घ्यायचं विसरून गेलो आहोत...हेच अज्ञान आहे आणि हेच मानवतेचे दारिद्र आहे.
                विवाह समस्यांचे मूळ ह्याच अज्ञानात आहे. आर्थिक संपन्नता, क्षमता आणि सुरक्षितता हा वैवाहिक संबंधांचा पाया आहे, हे इतकं दृढतर झाले आहे की पती-पत्नी  हे दोघेही  व्यक्ती स्वतंत्र नाही तर एकत्रित असे  विवाह संस्थेचे मुख्य आणि मुलभूत अंग आहे, हेच आपण दुर्लक्षित करून....घटस्फोट हे विवाह समस्येचे उत्तर आहे, असे समजून विवाह संस्थाच... आपण खिळखिळी करून टाकीत आहोत...हे अनेकांच्या अज्ञानाचे फलित आहे.
                सहजीवन म्हणजे एकमेकांना समजून घेणे....एकमेकांचे दोष, कमतरता, वैगुण्ये,वागण्याच्या पद्धती, विचारांच्या बैठकी..समजून घेऊन त्या स्वीकारणे....हे समजून घेण्याच्या प्रक्रियेचे अनिवार्य घटक आहेत, हे अमान्य करून सहजीवनाचा पायाच मुळी उखडून टाकला हात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा ह्या घडविल्या जातात....ह्या belief systems पती-पत्नी ह्यांच्या वेगवेगळ्या आहेत, हे मान्य केले, तरच समजून घेण्याची प्रक्रिया घडे शकते. विवाह हा एक संस्कार आहे...असं आपली संस्कृती सांगते.... ह्याचा अर्थ वैवाहिक जीवन हे घडत जात असते.....सहजीवनाच्या आधारावर. श्रद्धा म्हणजे आपल्या belief systems च्या आधारावर नव्हे, तर वैवाहिक संस्कार, सहजीवन हे जसजसे घडत जाईल, तसतसे परस्पर समजून घेण्याच्या क्षमता विकसित होत जातात.
                   तरीसुद्धा काही समस्या ह्या सहजीवन संस्कारातून निरसन होऊ शकणार नाहीत, तिथे आणि तेव्हा घटस्फोट अनिवार्य असतो, हे सत्य आहे. वैवाहिक समस्या जे जसे सत्य आहे, तसे घटस्फोट अनिवार्य असतो, हे सिद्ध कटू सत्य आहे.
                                     *************